निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा बुधवारी केली. या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. यंदा दोन टप्प्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, २ एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्यांपैकी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्वाधिक सात जागा रिकाम्या होणार आहेत. ७ जागांपैकी ६ जागा भाजप महायुतीला आणि केवळ १ जागा महाविकास आघाडीला मिळेल, असे विधानसभेतील पक्षीय संख्याबळ सांगते.
भाजपचा जुना नियम
सत्तारूढ भाजप सर्वसामान्य परिस्थितीत एका खासदाराला पुन्हा राज्यसभेवर संधी देत नाही, हा पूर्वानुभव असल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले वगळता माजी मंत्री भागवत कराड व धैर्यशील पाटील यांची राज्यसभा कारकीर्द संपुष्टात येणार, हेही जवळपास स्पष्ट आहे. विधानसभा व संसदेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा तोटा होणार हे स्पष्ट असून, फक्त एका जागेवर त्यांना आपला उमेदवार निवडून आणता येईल. या स्थितीत तीन पक्ष मिळून या एकमेव जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्ष हे तीन पक्ष राज्यसभेवर संधी देतील ते भाग्यवान कोण असणार, याची उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पराभव पत्करावा लागल्यावर जवळजवळ दोन वर्षांपासून महाराष्ट्रातून राज्यसभेत भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शरद पवार, आठवलेंसह तिन्ही भाजप सदस्य, फौजिया खान (राष्ट्रवादी), प्रियंका चतुर्वेदी (उबाठा), रजनी पाटील (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
मविआसाठी अवघड वाट
विधानसभेतील सध्याची संख्या पाहता, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकण्याची शक्यता आहे. म्हणजेच येत्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार हेही स्पष्ट आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या १९ पैकी भाजप आघाडीकडे सध्या १२, तर महाविकास आघाडीकडे ७ जागा आहेत. एप्रिल २०२६ नंतर हे आकडे मोठ्या प्रमाणावर बदलतील. भाजप ७ पैकी ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ आणि एकनाथ शिंदे गटाला १ जागा मिळेल तर महाविकास आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागू शकते. एका उमेदवाराला राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३७.५ आमदारांची मते आवश्यक आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बिहारमध्ये काय स्थिती?
बिहारमधून पाच नवे सदस्य निवडून येतील. राज्यसभेचे उपसभापती व जदयू नेते हरिवंश नारायण सिंह व भाजपने यंदाच्या बिहार निवडणुकीवेळी कथितरीत्या आश्वासन दिलेले उपेंद्र कुशवाह यांच्यासह बिहारमधील ५ राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ९ एप्रिल रोजी संपत आहे. यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीत एका जागेसाठी किमान ४१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असेल. हरिवंश यांना पुन्हा राज्यसभेवर आणण्यासाठी भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व अनुकूल आहे. या स्थितीत कुशवाह यांना संधी मिळणार का, याबाबतही चर्चा सुरू आहेत. बंकीपूर येथील आमदार आणि माजी मंत्री नितीन नबीन यांना भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, नितीन नवीन किमान एप्रिलच्या टप्प्यात राज्यसभेत जाणार नाहीत, असे पक्षसूत्रांनी सांगितले.