• Sun. Mar 8th, 2026
    Nandurbar Crime: शिक्षकानेच केला घात! शाळेतून विद्यार्थिनीला घेऊन झाला फरार, नंतर…; पालकांमध्ये पसरली भीती

    महेश पाटील, नंदुरबार: शिक्षक-विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नंदुरबार शहरात उघडकीस आली आहे. शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने त्याच्याच विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आल्याने पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी शिक्षकास २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षक उमेश अशोक शिंदे हा नंदुरबार शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने त्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला काहीतरी आमिष दाखवून व फूस लावून मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या आईने २८ जानेवारी २०२६ रोजी नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. प्रारंभी अज्ञात इसमाविरोधात अल्पवयीन युवतीस आमिष देऊन पळवून नेल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ३५१, २, ३, ७३ तसेच पोस्को ११२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

    दरम्यान, तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) संबंधित शिक्षकाला अटक केली. सध्या त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

    या प्रकारामुळे शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “ज्यांच्यावर मुलांचा विश्वास असतो, त्यांनीच विश्वासघात केला,” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शिक्षण क्षेत्रातील या गंभीर घटनेमुळे शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed