• Sat. Mar 7th, 2026
    Mulund Metro Accident : ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री मुलुंड दुर्घटनेची जबाबदारी घेतील का? हर्षवर्धन सपकाळांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

    मुंबईच्या मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून भीषण अपघात! एकाचा मृत्यू झाला असून काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘भ्रष्टाचाराच्या भागीदारी’चा आरोप केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील मेट्रो बांधकामाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर रुपाने समोर आला आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रो स्टेशनच्या पिलरचा सिमेंटचा भाग उंचावरून खाली असलेल्या रिक्षावर कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला असून, मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

    राजकीय वातावरण तापले

    या दुर्घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. “सो कॉल्ड इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री या दुर्घटनेची जबाबदारी घेतील का? की भ्रष्टाचारात भागीदारी असल्याने केवळ मलमपट्टी करून हे प्रकरण दाबले जाईल?” असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.सपकाळ पुढे म्हणाले की, “मेट्रोची कामे लोकवस्तीत सुरू असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? केवळ कामाचा वेग दाखवण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मुंबईकर एकतर खड्ड्यात मरतोय किंवा मेट्रोच्या जीवघेण्या अपघातात भरडला जातोय.” कंत्राटदारांवर आणि MMRDA वर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    Maharashtra TimesMumbai Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! आज रात्री विक्रोळी-मुलुंड स्टेशनदरम्यान मेगा ब्लॉक; लोकल फेऱ्यांवर मोठा परिणाम, काय आहे कारण? वाचा…

    मुख्यमंत्र्यांकडून मदत आणि चौकशीचे आदेश

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    Maharashtra TimesHarshwardhan Sapkal : ‘टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य

    सुरक्षेचे तीन-तेरा?

    मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी वारंवार होणारे अपघात हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पुरावा ठरत आहेत. उंचावर काम सुरू असताना खाली संरक्षक जाळ्या किंवा सुरक्षिततेची यंत्रणा का नव्हती, असा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारत आहे. मृताच्या वारसांना मिळणारी मदत आणि चौकशीचे आदेश यातून गेलेला जीव परत येणार नाही, असाही सूर नागरिकांमधून येतो आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा