आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही मोठे दावे केले आहेत. त्या दाव्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं.
“जो निर्णय झाला तो सहमतीने झाला. पक्षामध्ये सहमतीने झाला. आता त्याबद्दल भाष्य करण्याचा इतारांना काय अधिकार? कारण हा राजकीय निर्णय आहे. राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाला अधिकार आहे.आमचा राजकीय पक्ष हा भारतीय निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाला मान्यताप्राप्त आहे, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्व अधिकार आमचा आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
“सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला का? असा प्रश्न सुनील तटकरे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. राजीनामा दिलेला नाही, कारण उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असल्यामुळे त्यांची भेट घेणं हा आजच्या भेटीमागचं कारण होतं”, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा का दिला नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर “कुठल्याही व्यक्तीला राज्याचे किंवा देशाचे मंत्री होत असताना सहा महिने त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी असतो. अशावेळेला दुसऱ्या सभागृहाचं सदस्यत्व त्यांच्याकडे असेल तर तेही कायद्यान्वे ठेवता येतं. अजित पवार 1991 खासदार झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे केंद्रीय संरक्षण मंत्री झाले. त्यावेळी अजित पवार राज्यात सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात जावून राज्यमंत्री झाले. मी अजित पवार यांचं उदाहरण का दिलं? कारण आज त्या परिवाराशी निगडीत असलेल्या प्रश्न आहे म्हणून त्यांचं उदाहरण दिलं”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. त्याबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी भारत सरकारने आणि राज्य सरकारने करावी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची आहे. युरोपीयन कंपनीकडे तपास दिला होता का? कुणी फोन केला? ते मला माहिती नाही. त्यांनी कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमत असतं त्याची माहिती ते जाणकर असल्याने त्यांच्याकडे अधिक माहिती असेल”, असा टोला तटकरे यांनी लगावला.
“रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा. तर मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ ही 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजेची होती. ती भेट पावणे सात वाजता संपली. ती भेट तीन दिवस आधी ठरली होती. कारण दोन दिवस अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते, मी रायगडच्या दौऱ्यावर होतो”, असंदेखील सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
