Chandrapur BJP News: ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौरपद भाजपकडे राहील, तर त्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी शिवसेना (उबाठा) गटाकडे महापौरपद दिले जाईल.
या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष यांच्यात युती झाली असून, त्यानुसार महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी युतीची अधिकृत घोषणा करताना सांगितलं की, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांचा समावेश असलेली आघाडी सत्तास्थापन करणार आहे.
जोरगेवार यांनी सांगितलं की, भाजपकडे २४ नगरसेवक असल्याने पहिला महापौर भाजपचाच असणे अधिक योग्य होते. चंद्रपूरचा विकास भाजपच करू शकतो, हे अनेक नगरसेवकांना पटले आणि त्यामुळे ते आमच्यासोबत आले, असा दावा त्यांनी केला. संगीता खांडेकर यांच्या नावाने पक्षाने अधिकृत व्हीप काढला होता आणि त्यानुसार मतदान झाले.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितलं की, सुरुवातीपासूनच शिवसेनेची भूमिका महापौरपदासाठी ठाम होती. काँग्रेससोबत चर्चा सुरू असतानाही पाच वर्षांत एकदाही महापौरपद देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली नाही. त्यामुळे भाजपशी चर्चा करून नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद पाचही वर्षे शिवसेनेकडे राहील, तर स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी शिवसेनेला दिले जाईल.
दरम्यान, या सत्ताबदलामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकीकडे भाजप शिवसेना (उबाठा) युती सत्तेवर येत असताना, दुसरीकडे काँग्रेसला अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. आगामी काळात या नव्या युतीकडून शहराच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
