• Wed. Jun 17th, 2026

    हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2026
    हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

    मुंबई, दि. ४: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, कामगार आणि विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

    नानाजी देशमुख कृषी संजीवनी कार्यालयाच्या सभागृहात कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० चा आढावा  घेतला. यावेळी प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विभागाचे उप सचिव श्री. चंदनशिवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यात शाश्वत व हवामान परिणामांना सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या शेतीला अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात यावा. जो शेतकरी केवळ शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून असतो अशा शेतकऱ्यास  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मधील विविध योजनेचा लाभ मिळवून देउन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. या योजनेच्या लाभापासून मूळ लाभार्थी वंचित रहाणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

    शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे व शेतीतील नफ्याचे प्रमाण वाढवणे बरोबरच या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठीही उपाययोजना राबविण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी कृषी, आदिवासी विकास, वन विभाग यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करावी.

    नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा तयार कराव्यात. तसेच योजनेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करावी, असेही कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

    प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी सादरीकरणाद्वारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प १.० मध्ये राबविण्यात आलेल्या योजना, शेतकरी लाभार्थी, यामुळे झालेली फलनिष्पत्ती याची माहिती देऊन प्रकल्प २.० मध्ये करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात तुषार व ठिबक सिंचनामुळे रब्बी व उन्हाळी पिकाखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढले असल्याचे त्यांनी सांगितले .

    ००००

    एकनाथ पोवार/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed