• Sun. Mar 8th, 2026
    NCP Merger: शरद पवार गट एनडीएत येणार होता; विलीनीकरणाच्या चर्चेबाबत एका बड्या नेत्याची माहिती

    NCP Merger: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फोडले.

    sharad pawar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणानंतर पक्षाची पुढील वाटचाल कशी राहील, याची योजना शरद पवार आणि अजित पवार यांनी आखली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही ‘एनडीए’मध्ये सहभागी होणार होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने मंगळवारी दिली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून दूर करून त्यांच्या जागी ओबीसी चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची निवड केली जाणार होती. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्रीय, तर जयंत पाटील, रोहित पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याची योजना होती, असे या नेत्याने सांगितले.

    विलीनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, असा दावा माजी मंत्री जयंत पाटील आणि राजेश टोपे या दोघांनी केला. सध्या सुरू असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर म्हणजे, १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती, असेही बोलले जात आहे.

    Maharashtra TimesBMC Mayor Election : अखेर सस्पेन्स संपला? मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार होता. या विलीनीकरणाला भाजपने हिरवा कंदील दाखवला होता. विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग होणार होता. विलीनीकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार होते; तर राज्य मंत्रिमंडळात जयंत पाटील यांचा कॅबिनेट आणि रोहित पवार यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्याचे निश्चित झाले होते, असेही या नेत्याने सांगितले.

    Maharashtra TimesMumbai MHADA Lottery : स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! मुंबईत 120 फ्लॅटची लॉटरी, म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देणार; कसा करायचा अर्ज?
    ‘अजितदादांकडेच राहणार होती धुरा’
    एकत्रित राष्ट्रवादीची अनौपचारिक सूत्रे शरद पवार यांच्याकडे राहणार होती. मात्र, प्रत्यक्षात अजित पवार हेच पक्षाचा कारभार पाहतील, असे निश्चित झाले होते. तसेच पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे यांचे नाव जवळपास अंतिम करण्यात आले होते; परंतु, अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाला खीळ बसली असल्याचेही या नेत्याने सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा