Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रानात जळण गोळा करण्यासाठी गेलेल्या माहिलेसोबत भयंकर कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरण नेमकं काय ते समजून घ्या.
रोहा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहा तालुक्यातील एका गावालगतच्या शेजारील रानात ही घटना घडली. घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या एका विधवा महिलेचा त्याच गावातील एका इसमाने एकटी असल्याची संधी साधून विनयभंग केला. ग्रामीण भागात महिलांना दैनंदिन कामासाठीही सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाहीचा उद्रेक; रायगडमध्ये पती–पत्नी, सासू–सून निवडणूक रणांगणात
पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्या जवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडून “तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?” असे अत्यंत नीच, अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने महिलेला जबरदस्तीने जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या करीत आहेत.
महाराष्ट्रातील मिनी गोव्यात मृत्यूचा सापळा; मद्यपान, बेफिकिरीनं आतापर्यंत 250 हून अधिक पर्यटकांचे बळी
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “महिला व बाल विकास मंत्री असलेल्या जिल्ह्यातच महिलांवर अत्याचार होत असतील, तर सामान्य महिलांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करावी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मंत्री असोत वा प्रशासन, महिलांची सुरक्षा केवळ कागदावरच असल्याची भावना ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून व्यक्त होत आहे.
Raigad News: महाड राडा प्रकरण; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाची पोलिसांत शरण, आठ आरोपी ताब्यात
ग्रामीण भागात जळण आणणे, शेतात काम करणे, मजुरीसाठी बाहेर पडणे ही महिलांची दैनंदिन गरज असते. मात्र अशा कामांसाठी घराबाहेर पडताना देखील महिलांच्या सन्मानावर घाला घातला जात असल्याने समाज म्हणून आपण कुठे अपयशी ठरत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून पीडित महिलेला न्याय द्यावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही घटना केवळ एका महिलेपुरती मर्यादित नसून रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
