महायुतीची सत्ता स्थापन होऊन बराच कालावधी उलटून गेला असला तरी रायगड जिल्ह्याला अद्याप अधिकृत पालकमंत्री जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे अलिबागमधील प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळणार, यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. गतवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. त्या वेळी मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती; मात्र वरिष्ठांचा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
यंदा मात्र मंत्रालयाने थेट परिपत्रक जारी करून भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी मिळणे हे गोगावले यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar: काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! निष्ठावंतांना डावलल्याने खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड
विशेषतः पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या गोगावले यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अलिबागमध्ये जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यक्रमांचे उद्घाटन, ध्वजारोहणाचा मान किंवा प्रशासकीय उपस्थिती यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वारंवार कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी मध्यस्थी केली असली, तरी अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना मिळाल्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दुरावा कायम राहणार की कमी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याला कायमस्वरूपी पालकमंत्री कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्य सरकारकडून यावर लवकरच निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
