• Fri. Mar 20th, 2026

    राष्ट्रभक्तीचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश – राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 20, 2026
    राष्ट्रभक्तीचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश – राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद

    नांदेड, दि.२० : श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागमाच्या निमित्ताने ‘हिंद दी चादर’ अंतर्गत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. हा दोन दिवसीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार असून यामध्ये देशभरातून १० ते १२ लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

    या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्री, संत-महंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विविध समाजघटकांचा सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने नागरिक या समागमात सहभागी होणार आहेत.

    या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत व तरुण पिढीपर्यंत देशासाठी बलिदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांची माहिती पोहोचवणे हा आहे. श्री गुरु तेग बहादुरजी यांनी धर्म, मानवता व राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती, त्याग व सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होईल, असे राज्यमंत्री मिसाळ यांनी नमूद केले.

    दि. २५ जानेवारी रोजी होणारा मुख्य कार्यक्रम यशस्वी करून श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. या भव्य समागमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांचा जागर करण्यात येणार असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed