पारोळा तालुक्यात भाटपुरी गावाचा बोगस आयडी वापरून तब्बल 4,907 खोट्या जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय रॅकेटचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार असून, माजी खासदार किरीट सोमय्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
बिहारमधील आदर्शकुमार उर्फ विक्की अशोक दुबे या तरुणाने पारोळा तालुक्यात भाटपुरीनावाचे गाव नसतानाही, त्या नावाचा 13 बोगस आयडी तयार केला. 2010 ते 2025 या कालावधीत त्याने या आयडीचा वापर करून 4 हजार 907 बोगस जन्म दाखल्याच्या नोंदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे असेल पथक
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांचा समावेश आहे. तपास अधिकारी विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर) सहाय्यक तपास अधिकारी अशोक पवार (पोलीस निरीक्षक, पारोळा), सदस्य सतीष गोराडे (पीआय, सायबर पोलीस स्टेशन), मुस्तफा मिर्झा (पीएसआय, सायबर), शरद पाटील आणि दिलीप चिचोले यांचा या समितीत समावेश आहे.
किरीट सोमय्यांचा दौरा
बोगस जन्म नोंदींचे हे रॅकेट आंतरराज्यीयस्तरावर पसरलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या हे भाटपुरी गावाला भेट देऊन माहिती घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे प्रशासकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
किरीय सोमय्या काय म्हणाले?
“हे सगळं डिसेंबरमध्ये समोर आलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये माहिती हॅक झाल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. पण एक महिना निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेशमध्ये देखील दोन ठिकाणी अशाप्रकारे जन्म नोंद आढळले होते. एका ठिकाणी 52 हजार जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचा आहे. त्यात मास्टरमाईंड कोण आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
“बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं एक मोठं षडयंत्र सुरु आहे. मुंबई त्यांचं पहिलं टार्गेट आहे. महाराष्ट्रातही अन्य ठिकाणी या गोष्टी होत आहे. त्यांनी तहसीलद्वारे बोगस कागदपत्रे घेण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला. 2 लाख 24 हजार जन्म प्रमाणपत्र रद्द झाले. ती सिस्टीम मजबूत केल्यानंतर त्यांनी कम्प्युटर टर्म्युनल अॅप आहेत ते हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लक्षात आणलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं आहे की, या सगळ्या प्रकारामधील ऋटी नष्ट करणार. नवीन बांगलादेशी येऊ देणार नाही आणि आलेल्याला परत पाठवणार”, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
