• Sun. Mar 8th, 2026
    Jalgaon News : धक्कादायक! जळगावच्या ‘भाटपुरी’ गावात 4907 खोट्या जन्म नोंदी, चक्रावणारं प्रकरण समोर

    पारोळा तालुक्यात भाटपुरी गावाचा बोगस आयडी वापरून तब्बल 4,907 खोट्या जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय रॅकेटचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार असून, माजी खासदार किरीट सोमय्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या ‘भाटपुरी’ गावाचा बोगस आयडी तयार करून तब्बल 4 हजार 907 खोट्या जन्म नोंदी केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे. आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या मागणीनुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी भाटपुरी येथे भेट दिली.

    बिहारमधील आदर्शकुमार उर्फ विक्की अशोक दुबे या तरुणाने पारोळा तालुक्यात भाटपुरीनावाचे गाव नसतानाही, त्या नावाचा 13 बोगस आयडी तयार केला. 2010 ते 2025 या कालावधीत त्याने या आयडीचा वापर करून 4 हजार 907 बोगस जन्म दाखल्याच्या नोंदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    असे असेल पथक

    या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांचा समावेश आहे. तपास अधिकारी विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर) सहाय्यक तपास अधिकारी अशोक पवार (पोलीस निरीक्षक, पारोळा), सदस्य सतीष गोराडे (पीआय, सायबर पोलीस स्टेशन), मुस्तफा मिर्झा (पीएसआय, सायबर), शरद पाटील आणि दिलीप चिचोले यांचा या समितीत समावेश आहे.

    किरीट सोमय्यांचा दौरा

    बोगस जन्म नोंदींचे हे रॅकेट आंतरराज्यीयस्तरावर पसरलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या हे भाटपुरी गावाला भेट देऊन माहिती घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे प्रशासकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

    किरीय सोमय्या काय म्हणाले?

    “हे सगळं डिसेंबरमध्ये समोर आलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये माहिती हॅक झाल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. पण एक महिना निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेशमध्ये देखील दोन ठिकाणी अशाप्रकारे जन्म नोंद आढळले होते. एका ठिकाणी 52 हजार जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचा आहे. त्यात मास्टरमाईंड कोण आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

    “बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं एक मोठं षडयंत्र सुरु आहे. मुंबई त्यांचं पहिलं टार्गेट आहे. महाराष्ट्रातही अन्य ठिकाणी या गोष्टी होत आहे. त्यांनी तहसीलद्वारे बोगस कागदपत्रे घेण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला. 2 लाख 24 हजार जन्म प्रमाणपत्र रद्द झाले. ती सिस्टीम मजबूत केल्यानंतर त्यांनी कम्प्युटर टर्म्युनल अॅप आहेत ते हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लक्षात आणलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं आहे की, या सगळ्या प्रकारामधील ऋटी नष्ट करणार. नवीन बांगलादेशी येऊ देणार नाही आणि आलेल्याला परत पाठवणार”, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा