• Mon. Mar 16th, 2026

    ७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 16, 2026
    ७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण – महासंवाद

    नवी दिल्ली दि. 16 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘ॲट होम’ स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

    रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध ‘कृषिरत्न’ चंद्रशेखर हरि भडसावळे यांच्या  शेती, नैसर्गिक शेती, शून्य-नांगरणी तंत्र (एसआरटी), जलसंवर्धन, कृषी पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामधील  उल्लेखनीय कामगिरीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. 1976 पासून शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भडसावळे यांनी नेरळ येथील ‘सगुणा बाग’ला एकात्मिक शेतीचा एक जागतिक दर्जाचा आदर्श नमुना म्हणून विकसित केले आहे. मत्स्यव्यवसाय, वनशेती, फलोत्पादन, गो-पालन आणि पर्यटन यांची सांगड घालणारे हे मॉडेल आज देशभरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले असून, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

    वैद्यकीय क्षेत्रातील मानवतावादी कार्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील विख्यात तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांना ही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून एमडी पदवी प्राप्त केल्यानंतर, शहरात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अतिमागास आणि डोंगराळ अशा मुखेड भागाची रुग्णसेवेसाठी निवड केली. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी सर्पदंशावरील उपचारांत क्रांती घडवून आणली आहे. 1988 मध्ये मुखेड परिसरात सर्पदंशामुळे होणारा 25 टक्के मृत्यूदर आज डॉ. पुंडे यांच्या शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे शून्य टक्क्यांवर आला आहे. त्यांच्या या कार्याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) दखल घेऊन त्यांची निवड ‘राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समिती’मध्ये केली आहे.

    याच सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील अरविंद गुलाब चौधरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा लाभ घेऊन आपले हक्काचे घर मिळवणाऱ्या यशस्वी लाभार्थ्यांचे प्रतिनिधित्व ते या सोहळ्यात करणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात कसा बदल असल्याचे उदाहरण ठरले आहेत.

    तसेच, मुंबईचे युवा उद्योजक आकाश शहा यांना स्टार्टअप्स आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत असताना, आकाश शहा यांनी या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल राष्ट्रपती भवनाकडून घेण्यात आली आहे.

    प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा ‘ॲट होम’ हा एक अत्यंत प्रतिष्ठित सोहळा मानला जातो.

    0000000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्तविशेष – 16/ दि.16.01.2026

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed