• Fri. Mar 6th, 2026

    Election News: धक्कादायक! उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मतदानाआधी ‘कॅश’चा धुरळा; 50 लाख सापडल्याने खळबळ, काय घडलं?

    Election News: धक्कादायक! उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मतदानाआधी ‘कॅश’चा धुरळा; 50 लाख सापडल्याने खळबळ, काय घडलं?

    उल्हासनगरमध्ये प्रचार संपल्यानंतर संशयास्पद हालचाली उघडकीस आल्या असून मोठ्या रकमेच्या जप्तीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, ठाणे : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा थंडावताच पैशांच्या कथित वाटपाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅम्प क्रमांक ४ येथील सुभाष टेकडी परिसरातून जाणाऱ्या एका रिक्षामधून तब्बल सुमारे ५० लाख रुपयांची रोकड असलेली काळी बॅग पकडण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून, सखोल चौकशी सुरू आहे.

    मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निवडणूक प्रचार संपल्यानंतरही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसून आले. कॅम्प नं. ४, सुभाष टेकडी परिसरातून जाणाऱ्या एका रिक्षामध्ये काळ्या रंगाची बॅग दिसताच स्थानिक उमेदवार नरेश गायकवाड आणि प्रशांत धांडे यांना संशय आला. त्यांनी रिक्षाचा पाठलाग करून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अडवली. बॅगची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.

    घटनेची माहिती तात्काळ विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षा चालकासह संबंधित दोघांना ताब्यात घेतले आणि पैशांची बॅग जप्त केली. महापालिकेच्या भरारी पथकानेही घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई केली. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी बॅगमध्ये अंदाजे ५० लाख रुपयांची रोकड असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.

    ही रक्कम मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आणली जात होती का, याबाबत तपास सुरू असून, रिक्षा चालक व ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विठ्ठलवाडी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    दरम्यान, शहरात मतदानाच्या तोंडावर पैशांची सर्रास ने-आण सुरू असताना महापालिकेच्या भरारी पथकाची भूमिका काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रचार संपल्यानंतरही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमधील निवडणूक वातावरण तापले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा