Eknath Shinde Vs Ganesh Naik: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता शिंदे – नाईक संघर्षही पेटला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात, “काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो” असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला होता. या वक्तव्याने नाईक समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. या टीकेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी घणसोली येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत आक्रमक भूमिका घेत थेट प्रत्युत्तर दिले.
“माझं वय झालं आहे असं म्हणतात. पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग. अर्धा तास तरी चालतात का ते पाहू,” असा खोचक टोला गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला. याचवेळी त्यांनी, “दिलेलं आव्हान हरलो, तर राजकारण सोडून देईन,” असे ठणकावून सांगत थेट आव्हान दिले. या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
Ganesh Naik: ‘उन्माद कराल तर मोडण्याची ताकद आहे’, गणेश नाईकांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना जाहीर आव्हान
नाईक यांनी यावेळी आपण आजही शारीरिक आणि राजकीयदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगत, वयावरून केलेली टीका साफ फेटाळून लावली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रचारसभेत एकच खळबळ उडाली. परिणामी, महापालिका निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राहता, राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनल्याचे स्पष्ट होत आहे.
नवी मुंबईत याआधीच विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि सत्तासमीकरणांवरून राजकीय संघर्ष सुरू होता. मात्र, शिंदे पिता-पुत्र आणि गणेश नाईक यांच्यातील या वैयक्तिक टीकांनी प्रचाराला वेगळीच धार दिली आहे. महापालिका निवडणुकीत वैयक्तिक टीकांचा भडका उडाल्याने दोन्ही गट आमनेसामने आले असल्याचे चित्र आहे.
या शाब्दिक संघर्षामुळे आगामी दिवसांत प्रचार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे असून, नवी मुंबईतील राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे-नाईक संघर्षाचा मतदारांवर नेमका काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा संघर्ष कोणते वळण घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
