जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान ओवेसींनी एक विधान केलं आहे, जे सध्या खूप चर्चेत आलं आहे.
ओवेसींचे वादग्रस्त विधान काय?
जालना महानगरपालिका निवडणुकीतील एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ओवेसी बोलत होते. यावेळी विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “काही जणांना आता माझे कपडे आवडू लागले आहेत. मात्र, एक लक्षात ठेवा, नथुराम गोडसे माणसात नव्हता, त्याला माणसं आवडायची. तशीच सवय आता या लोकांना (विरोधकांना) लागली आहे.” ओवेसींच्या या विधानाचा रोख थेट सत्ताधारी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडे असल्याचे मानले जात आहे. “जर मी बोलण्यावर उतरलो, तर शब्द कमी पडतील,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Mahayuti Manifesto: 35 लाख घरं, अर्ध्या तिकीटात प्रवास ते मोफत…, सत्ताधारी महायुती मुंबईकरांना काय-काय देणार? वाचा वचननाम्यातल्या मोठ्या घोषणा
९० टक्के मतदानाचे आवाहन
ओवेसींनी यावेळी बिहार निवडणुकीतील यशोगाथा सांगत जालन्यातील मतदारांना साद घातली. “बिहारमध्ये मजलीसचे पाच उमेदवार जिंकले, कारण तिथल्या महिलांनी ९० टक्के मतदान केले. त्यामुळे पाचपैकी तीन आमदार निवडून आले. जालन्यातही एमआयएमच्या उमेदवाराला ९० टक्के मतदान झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राजकीय प्रतिक्रिया?
ओवेसींनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा संदर्भ देऊन विरोधकांवर टीका केल्याने भाजप आणि इतर पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींनी हा ‘ध्रुवीकरणाचा’ डाव खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ओवेसींच्या या भाषणानंतर जालन्यातील निवडणुकीला आता हिंदू-मुस्लिम आणि गोडसे विरुद्ध गांधी अशा वादाचे स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओवेसींनी आज मराठवाड्यातील परभणीतही सभा घेतली.
