अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने भाजपला शह दिला आहे. काँग्रेसच्या १२ निलंबित नगरसेवकांना भाजपने पक्षात घेतल्यानंतर, शिंदेसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक आपल्यासोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेत नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. भाजप नं शिंदेसेनेला धक्का देत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केलेल्या असताना शिंदेसेनेनं भाजपलाच शह दिला आहे. आधी भाजप सोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याकडे खेचत शिंदेसेनेनं थेट सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. कल्याणचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या १२ निलंबित नगरसेवकांना भाजपमध्ये घेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिंदेसेनेला धक्का दिला होता. पण आता शिंदे यांनी चव्हाण यांना काटशह दिला आहे.
काँग्रेस रिकामी, भाजपची मुसंडी अन् शिंदे पितापुत्रांची कोंडी; चव्हाणांनी 24 तासांत गेम फिरवला
अंबरनाथमध्ये ट्वि्स्ट पे ट्विस्ट
अंबरनाथमध्ये गेल्या महिन्यात नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यात शिंदेसेना, भाजप स्वबळावर लढले. शिंदेसेनेला सर्वाधिक २७, तर भाजपला १४ जागा मिळाल्या. पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत भाजपनं शिंदेसेनेला धक्का दिला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी भाजपनं हालचाली सुरु केल्या. त्यासाठी १२ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला आणि ४ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यात आलं. भाजपनं सत्तेसाठी काँग्रेसशी युती केल्यानं या सगळ्याची बरीच चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. कारवाईचा इशारा दिला.
हवं तेच झालं! कारवाई काँग्रेसची, पण धक्का शिंदेसेनेला अन् फायदा भाजपला; चक्रावून टाकणारं राजकारण
काँग्रेसनं त्यांच्या १२ नगरसेवकांचं थेट निलंबन केलं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दुसऱ्याच दिवशी या बाराही नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलं. काँग्रेसचे निलंबित नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आधारे भाजपनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी चव्हाण यांना काटशह दिला. शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत भाजपला चेकमेट केलं. शिवसेनेच्या २७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ अशा ३१ नगरसेवकांचा गट तयार करत शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेची सदस्यसंख्या ५९ इतकी आहे. बहुमताचा आकडा ३० इतका आहे.
