Bhai Jagtap Congress: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमात जगताप यांनी विविध विषयांवर आपली मते, पक्षाची धोरणे मांडली.
‘भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक मुद्दा हाताशी धरून जाणीवपूर्वक खोटे आरोप केले जात आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच ‘काँग्रेसला काही विशिष्ट समाजच मतदान करतो, असा समज करून घेणे चुकीचे असून मराठी माणूसही काँग्रेसला मतदान करतो,’ असेही त्यांनी अधोरेखित केले. ‘सध्याचे राजकारण हे बाजारू झाले आहे,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
Mumbai Local Train Fire : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकल ट्रेनच्या डब्ब्याला आग, CSMT ला जाणारी स्लो लोकल तात्पुरती बंद
‘आपली मुंबई ही मिनी भारत म्हणू ओळखली जाते. आज आपल्या देशात हिंदू खतरें मे है, अशी ओरड केली जात असून या माध्यमातून हिंदू- मुस्लिम तणाव निर्माण करून निवडणुका लढविल्या जात आहेत. हा अघोषित अजेंडा राबविला जात असून त्यासाठी राजकारण केले जात आहे. हा भाजप आणि रा. स्व. संघाचा अजेंडा आहे’, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी केला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सत्ताधाऱ्यांचा ‘फेक नरिटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ या उपक्रमांतर्गत जगताप यांनी गुरुवारी ‘मटा’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. वंचितसोबत केलेल्या आघाडीबाबत आणि जागावाटपाच्या घोळाबाबत भाई जगताप यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे आम्ही या स्वबळावर लढाव्यात अशी भूमिका घेतली होती. मात्र, या लढाईत समविचारी पक्षाला सोबत घेण्याची गरज लक्षात घेता आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाशी आघाडी केली.
ही मानसिकता चुकीचीच
मुंबईतील काही मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांऐवजी त्यांच्या पतीचे आणि वडिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रचारातून उमेदवारांचा फोटो गायब करण्यात आले आहेत, याबाबत भाई जगताप यांच्याकडे विचारणा केली असता. आपण या गोष्टींचे समर्थन करणार नाही, ही मानसिकता चुकीची असून उमेदवारांचा चेहरा दाखवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
Prakash Mahajan : ‘राज ठाकरे वैफल्यग्रस्त’, प्रकाश महाजन यांची खोचक टीका
आतापर्यंत अटक का केली नाही?
काँग्रेस आमदारामुळे बांगलादेशी रोहिंगे वाढले असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केली जाते. याबाबत भाई जगपात यांनी सत्ताधाऱ्यांनाच लक्ष्य केले. सरकार त्यांचे आहे, त्यांना कुणी अडविले. जर या प्रकरणातील दोषी माहीत आहेत, तर त्यांना अटक का केली नाही, असा संतप्त सवालही भाई जगताप यांनी उपस्थित केला. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे. तुमच्या नाकाखाली हा प्रकार होतोय. बांगलादेशची निर्मिती इंदिरा गांधी यांनी केली. तशी हिंमत दाखवा, असे थेट आवाहन त्यांनी सरकारला दिले.
…म्हणून त्या सर्व नगरसेवकांचे निलंबन
राज्यभरात जवळपास ६५ नगरसेवक बिनविरोध निवडून येतात. अशी परिस्थिती गेल्या ७८ वर्षांत देशातील जनतेने कधीच पाहिली नव्हती. यासाठी फक्त एकाच पक्षाला जबाबदार धरता कामा नये. परंतु ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, ते चुकीचे असल्याची उद्विग्नता जगताप यांनी यावेळी व्यक्त केली. किंबहुना म्हणून अंबरनाथ नगर परिषदेत भाजपसोबत झालेल्या हातमिळविणीला विरोध करतानाच आम्ही त्या सर्व नगरसेवकांचे निलंबन केल्याचे जगताप यांनी आवर्जून स्पष्ट केले.
