• Fri. Mar 6th, 2026

    कसली तत्त्वं? सत्तेला महत्त्व! काँग्रेस-भाजप एकत्र, सुत्रं फिरली, युती तुटली; शिंदेसेना लाभार्थी

    कसली तत्त्वं? सत्तेला महत्त्व! काँग्रेस-भाजप एकत्र, सुत्रं फिरली, युती तुटली; शिंदेसेना लाभार्थी

    अंबरनाथ नगरपालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र, ही अनैसर्गिक युती अवघ्या काही तासांतच तुटली. आता शिंदे सेनेची ताकद वाढली असून, त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची सौदाशक्ती वाढली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील अंबरनाथ नगरपालिकेतील सत्ताकारणाच्या दृष्टीनं सुरु असलेल्या घडामोडी चर्चेत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. या विचित्र युतीचे पडसाद राज्यभर उमटले. काँग्रेस, भाजपच्या राज्य नेतृत्त्वानं या अनैसर्गिक युतीची दखल घेतली. त्यामुळे अवघ्या काही तासांत युती तुटली.

    अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या. पण पक्षाला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. त्यानंतर शिंदेसेनेला बहुमतापासून रोखण्यासाठी भाजपनं १२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणि ४ जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. भाजपच्या या चालीमुळे शिंदेसेना सत्तेपासून दूर राहिली. भाजपनं केलेल्या या युतीमुळे शिंदेसेनेत नाराजी पसरली. शिंदेसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी संताप व्यक्त केला.
    Maharashtra Timesभाजप-काँग्रेसची युती, पहिली विकेट पडली; प्रदेशाध्यक्षांनी फर्मान काढलं, मोठी कारवाई
    एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देत असताना अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेसशी युती केली. या युतीचं वृत्त देशभरातील माध्यमांनी दिलं. तत्त्वांची भाषा करणारे, विचारधारा सांगणारे सत्तेसाठी काय काय करतात, कशा आघाड्या, युत्या करतात, अशी चर्चा यामुळे पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सोबतच्या युतीबद्दल तीव्र नाराजी बोलून दाखवली. तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या १२ नगरसेवकांचं निलंबन केलं. वरिष्ठ पातळीवरुन चक्रं फिरल्यानं भाजप-काँग्रेसची युती अवघे काही तासच टिकली.
    Maharashtra Timesअजितदादांच्या धुरंधर नेत्याविरोधात भाजपची फिल्डींग; विधानसभेला सव्वा लाख मतं घेणारा नेता परतणार
    अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेला एकटं पाडून भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्तेचा सोपान गाठला. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागलं. पण आता काँग्रेस-भाजपची युती तुटल्यानं शिंदेसेनेनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. युती तुटल्याची सर्वाधिक मोठी लाभार्थी शिंदेंची शिवसेना ठरली आहे. आता शिंदेसेनेशिवाय सत्ता स्थापना करता येणार नाही, असं संख्याबळ आहे. त्यामुळे शिंदेसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. तर या युतीमुळे भाजप , काँग्रेस डॅमेज झाली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा