अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमच्या युतीने देशभरात खळबळ उडाली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या अनैसर्गिक युतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाखळे यांना खुलासा मागितला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप-एमआयएमची युती झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपचं हिंदुत्त्व गेलं कुठे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. सत्तेसाठी पक्ष कोणत्याही पातळीला जात लागल्याची खंत निष्ठावंत व्यक्त करु लागले. अनैसर्गिक युतीची चर्चा देशभरात झाली. या सगळ्यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली. त्यामुळे भाजपनं अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना पत्र लिहून खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कसली तत्त्वं? सत्तेला महत्त्व! काँग्रेस-भाजप एकत्र, सुत्रं फिरली, युती तुटली; शिंदेसेना लाभार्थी
‘नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत २०२५ मध्ये आपण अकोट नगर परिषदेमध्ये एमआयएम सोबत युती करुन भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच असे करीत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा,’ अशा सूचना आमदार प्रकाश भारसाखळे यांना पत्रातून करण्यात आल्या आहेत. या पत्रावर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.
भाजप नं अकोट नगर पंचायतीत सत्ता मिळवण्यासाठी एमआयएमला सोबत घेत ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली. विशेष म्हणजे या विकास मंचात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बच्च कडू यांच्या प्रहार पक्षाचादेखील समावेश करण्यात आला. त्यामुळे या आघाडीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. या आघाडीचं गटनेते भाजप आमदार रवी ठाकूर यांच्याकडे देण्यात आलं.
भाजप-काँग्रेसची युती, पहिली विकेट पडली; प्रदेशाध्यक्षांनी फर्मान काढलं, मोठी कारवाई
दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस ची युती झाली. शिंदसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी झाली. या विचित्र युतीची चर्चादेखील देशभरात झाली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी केली. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोबतच भाजप सोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचंही निलंबन करण्यात आलं. एकीकडे काँग्रेसनं थेट निलंबनाची कारवाई केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपनं कारणे दाखवा नोटिस बजावलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कठोर कारवाईची जोरदार चर्चा आहे.
