• Mon. Mar 9th, 2026
    लातूर विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण तापले, नवोदयच्या अनुष्काचा मृत्यू की घातपात? गांधी चौकात महिला प्रचंड संतप्त, साड्यांच्या दोरीने अडवला रस्ता…

    नवोदयच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूला जबाबदार कोण? पोलिसांची कारवाई आणि आंदोलकांचा आक्रोश यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूरजवळील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीत शिकणाऱ्या अवघ्या ११ वर्षांच्या अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. “माझ्या लेकीने आत्महत्या केली नाही, तर तिचा घातपात झाला आहे,” असा आक्रोश करत आज लातूरच्या ऐतिहासिक गांधी चौकात महिलांनी रौद्र रूप धारण केले. संतप्त महिलांनी चक्क आपल्या साड्यांची दोरी तयार करून रस्ता रोखून धरल्याने शहराची वाहतूक तासनतास ठप्प झाली होती.

    नेमकं प्रकरण काय?

    जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात काल अनुष्काचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. शाळेत अत्यंत हुशार आणि चुणचुणीत समजल्या जाणाऱ्या अनुष्काने टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. प्राथमिक अंदाजानुसार अभ्यासाचा ताण असल्याचे बोलले जात असले तरी, अनुष्काच्या नातेवाईकांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. शाळेत काहीतरी काळंबेरं असून अनुष्काचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

    गांधी चौकात महिलांचा आक्रोश

    आज सकाळी अनुष्काच्या न्यायासाठी शेकडो महिला आणि नातेवाईक गांधी चौकात एकवटले. आंदोलनाचे स्वरूप इतके तीव्र होते की, महिलांनी रस्त्यावर आडवे पडून आणि हातात साड्या धरून मानवी साखळी तयार केली. “दोषींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शासन करू,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भर उन्हात महिलांचा सुरू असलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले.

    Maharashtra TimesBandra Terminus: वांद्रे टर्मिनसवर मोठी अपग्रेड! तीन नव्या मार्गिकांमुळे लोकलची संख्या वाढणार; काय आहेत नवे बदल?

    पोलिसांचा बळाचा वापर, तणाव कायम

    रास्ता रोकोमुळे लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला हटायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून रस्ता रिकामा केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना ओढून रस्त्याबाहेर काढले, पण महिलांचा संताप शांत झालेला नाही.

    सध्या एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, विद्यालयातील सुरक्षिततेवर आणि अनुष्काच्या मृत्यूच्या कारणांवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा