MNS Raj Thackeray: मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे हे एकदाही शिवसेना भवनात गेले नव्हते. परंतु आता जाहीरनाम्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर ते शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत.
दोन्ही बंधू जवळपास दोन दशकांनंतर ते एकत्र आले आहेत. याअंतर्गत ४ जानेवारीला ठाकरे बंधू मुंबईसाठी संयुक्त जाहीरनामा जनतेसमोर मांडणार आहेत. ‘हा आमच्यासाठी सुवर्णक्षण असेल’, अशी भावना शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वरळी झालेल्या सभेतून ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत, कसे लढणार, असा प्रश्न मला काही पत्रकारांनी विचारला. मी म्हणालो की, देखकर धुंधलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता. झुठी आंधीसे वह डरे जिन चिरागोंमे दम नही होता. मुंबईत आता श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्या टोळीतील अबोध बालके श्रेय चोरत आहेत. कोस्टल रोड,मेट्रो आम्ही केली म्हणतात. पब्लिक है सब जानती है. कोस्टल रोड,बीडीडीचा विकास, मेट्रो कोणी केले कोणीही सांगेल. प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली हे विचारा ते एकच नाव घेतील ते म्हणजे उद्धव ठाकरे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही. जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो. पण विचाराचा वारसा कर्माने मिळतो तो आमच्या एकनाथ शिंदेंकडे आहे, महायुतीकडे आहे’.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीही यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘मराठी माणसाचे नाव घेत यांनी इतकी वर्षे मुंबईकरांना फसवले. निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी होणार, अशी आवई यांच्याकडून उठवण्यात येते. पण मुंबई ही मराठी माणसांची होती व सदैव मराठी माणसाचीच राहील. ही गिरणी कामगार, डबेवाले, चाकरमान्यांची मुंबई आहे. कुणीही आले तरी ती महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.
