• Wed. Jun 17th, 2026
    Thane Election: ‘आम्ही निवडणूक लढवायची की नाही?’, विरोधकांच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्याच्या सत्रावरून मनसेचा संताप

    ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज छाननीदरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. मनसे नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केलेले गंभीर प्रश्न चर्चेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रतिक्षा लागली असून, आता खऱ्या अर्थाने ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. मात्र, याच काळात अनेक उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेषतः, विरोधकांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद केले जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.

    “निवडणूक अधिकाऱ्यांनी केला भेदभाव!”

    एका वृत्तवाहिनीशी बोलताना अविनाश जाधव यांनी निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केला आहे. नियमानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर ते अर्ज कार्यालयात तत्काळ डिस्प्लेला लावणे बंधनकारक असते. मात्र, काल साडेतीन वाजेपर्यंत हे अर्ज लावण्यातच आले नाहीत. हा लपवाछपवीचा प्रकार संशयास्पद आहे.”, असं जाधव म्हणाले.
    Maharashtra TimesMurlidhar mohol: निवडणूक होण्याआधीच पुण्याच्या महापौरपदाबाबत मंत्री मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

    शिंदे गटाला झुकतं माप? जाधवांचा थेट सवाल

    अविनाश जाधव यांनी थेट शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांवर निशाणा साधला. “निवडणुकीचा नियम सांगतो की अर्जातील एकही रकाना रिकामा राहता कामा नये, अन्यथा अर्ज बाद होतो. शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज अपूर्ण भरले असतानाही त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. मग तोच न्याय आमच्या उमेदवारांना का नाही?” असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

    “आमच्या उमेदवारांची काय चूक?”

    मनसेच्या एका महिला उमेदवाराचे उदाहरण देताना जाधव भावूक आणि संतप्त दिसले. ते म्हणाले, “आमच्या महिला उमेदवार सकाळी ११ च्या आधीच कार्यालयात पोहोचल्या होत्या. मात्र, तिथे निवडणूक अधिकारी चहा-पाणी करण्यात व्यस्त होते. तरीही वेळेत हजर न राहिल्याचे कारण देत त्यांचा अर्ज फेटाळला गेला. एखाद्या कार्यकर्त्याचे संपूर्ण करिअर निवडणूक यंत्रणेने एका फटक्यात उद्ध्वस्त केले आहे.

    कार्यकर्त्यांनी आयुष्यभर मेहनत करायची आणि पोचपावती मिळण्याची वेळ आली की त्यांचे अर्ज बाद करायचे? मग आम्ही निवडणूक लढवायची की नाही?”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा