उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. कल्याण-डोंबिवलीचे माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेलं पत्र चर्चेत आहे.
कैलास शिंदे यांच्या पत्राचा आशय काय?
‘सध्या देशात-राज्यात-जिल्ह्यात-शहरांत तसंच गावात ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे. तर हल्ली तुमच्या एकनिष्ठ असणं, किती कार्य केलं, तुमचा अनुभव, शिक्षण यांना शून्य महत्त्व असून तुम्ही आर्थिक किती मजबूत आहात याला महत्त्व आहे. तुमच्याकडे फक्त पैसा असेल तरच तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र आहात असा अधोरेखित नियम झाला आहे,’ असा उल्लेख पत्रात आहे.
‘गुरुवर्य आनंद दिघे साहेब आणि गुरुबंधू एकनाथ शिंदे यांना एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणं हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळण्यास पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, ही नम्र विनंती,’ असा भावना शिंदे यांनी पत्रात नमूद केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गुरुबंधू असा करणाऱ्या कैलास शिंदे यांनी माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून हे शब्द पत्रात ठसठशीतपणे लिहिले आहेत. त्यामुळे त्या शब्दांनी लक्ष वेधून घेतलं आहे. तसदीबद्दल क्षमस्व आणि आपणास शुभेच्छा या शब्दांनी त्यांनी पत्राचा शेवट केला आहे. कैलास शिंदे प्रभाग क्रमांक ६१ चे नगरसेवक राहिले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्यांनी सभागृह नेते, गटनेते अशी पदं भूषवली आहेत. कल्याण पूर्वेतील शिळरोड भागात त्यांचं कार्यालय आहे. त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव दिलेलं आहे.
