• Fri. Mar 6th, 2026
    खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याप्रकरणात मोठी माहिती, कोर्टात आरोपींना…

    Khopoli Corporator Husband Murder Case: ​गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, राजकीय संदर्भ आणि आरोपींच्या कारवायांमुळे खोपोलीत ही घटना सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: राजकीय वादातून घडलेल्या मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणात खोपोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नऊ आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने खोपोली परिसरात तीव्र खळबळ निर्माण झाली असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे.

    शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी राजकीय वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या खोपोलीत समाज आणि राजकीय मंडळींसाठी धक्कादायक ठरली. घटनास्थळी पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि गुन्ह्यासंबंधी माहिती गोळा केली.

    या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, प्रवक्त्यांसह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये रविंद्र देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मिला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरीभाई पवार यांचा समावेश आहे.
    Maharashtra TimesRaigad Crime: खोपोलीत नगरसेविकेच्या पतीला संपविणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर, कोण आहेत ते?
    सर्व आरोपींना रविवारी खालापूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा शोध आणि इतर संभाव्य आरोपींना अटक होणे बाकी असल्याचे मांडले. यावरून न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

    ही कारवाई खोपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील साक्षीदारांची चौकशी सुरू ठेवली आहे. पुढील तपासात पोलिस आरोपींचा नेमका हेतू, राजकीय वादाशी संबंध आणि गुन्ह्यातील इतर घटकांचा शोध घेत आहेत.

    पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात आले असून, पुढील तपास आणि इतर संभाव्य आरोपींच्या अटकेसाठी कारवाई सुरू आहे.
    खोपोली पोलिसांच्या या स्ट्राइकमुळे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे. समाजातील राजकीय हिंसेविरोधात पोलिस प्रशासन सतर्क राहणे आवश्यक असल्याचे यातून स्पष्ट होते.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा