शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची घोषणा उद्या होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनी पहिल्यांदा ५ जुलैला एकत्र आले. आता पाच महिन्यांनी दोघे पुन्हा सोबत येत आहेत.
मुंबईच्या वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होणार आहे. विशेष म्हणजे याच वरळीत उद्धव आणि राज तब्बल दोन दशकांनंतर सार्वजनिकरित्या एका मंचावर आले होते. ५ जुलै २०२५ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयी मेळाव्यात एकत्र आले होते. त्यावेळी महायुती सरकारनं प्राथमिक शाळेत हिंदी भाषा सक्तीचा जीआर काढला होता. त्या विरोधात दोन्ही भाऊ एकत्र आले. हिंदी सक्तीचा विषय बराच तापला. याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सरकारनं जीआर मागे घेतले. तेव्हा ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळावा घेतला होता. त्याला आता ५ महिने उलटले आहेत.
उद्या पुन्हा एकदा वरळीत दोन बंधूंसाठी महत्त्वाचा दिवस असेल. शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची घोषणा केली जाईल. वरळी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. राजकारणात निवडणुकीच्या आखाड्यापासून कायम दूर राहणाऱ्या ठाकरे कुटुंबानं वरळीतूनच निवडणुकीच्या आखाड्यात प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये वरळीतून विधानसभा निवडणूक लढवली. २०२४ मध्येही ते याच वरळी मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठी वरळीचं महत्त्व मोठं आहे.
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात उतरणार असल्यानं राज ठाकरेंनी यांनी २०१९ मध्ये मनसेकडून उमेदवार दिला नव्हता. त्याचा लाभ आदित्य यांना झाला. ते मोठ्या मताधिक्क्यानं निवडून आले. आता त्याच वरळीत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. यापैकी १५० ते १६० जागा शिवसेना उबाठा लढू शकते. तर मनसेला ६० ते ७० जागा दिल्या जाऊ शकतात.
