राज्यातील नगर परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपने युतीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होणार असल्याचेही सूतोवाच केले होते. नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निकालानंतर भाजपची राजकीय स्थिती खूपच मजबूत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पालिकांच्या निवडणुकीसाठी युती करताना भाजप अधिक ताठर भूमिका घेणार, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई, ठाणे, पुणे अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप युतीबाबत वाटाघाटी करीत असल्याचे चित्र असले, तरी शक्यतो या पालिकांमध्ये स्वबळ अजमाविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
Supriya Sule: महाविकास आघाडी फुटल्यास इतरही ऑप्शन; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
पुणे शहरामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू असली तरी शिवसेनेचे शहरातील नेते रवींद्र धंगेकर यांनी मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करावी, असा आग्रह धरला आहे. भाजपकडून शिवसेनेला पुरेशा जागा मिळणार नसल्याने ते ही भूमिका मांडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या भूमिकेला अजूनही पाठिंबा दिला नसला, तरी ऐनवेळी ते तसे करू शकतील असे बोलले जाते. मुंबई व ठाणे महानगरपालिकांमध्येही काहीसे असेच चित्र आहे. तिथे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची ताकद फारशी नाही. त्यामुळे शिवसेना व ‘राष्ट्रवादी’ची आघाडी करून भाजपशी दोन हात करणे किती फायदेशीर ठरेल, याचा अंदाज घेणे सुरू आहे.
ठाण्यामध्येही भाजप व शिवसेना हेच प्रतिस्पर्धी राहण्याची शक्यता असून, तिथे अजित पवार हे शिंदेंच्या बाजूला जाणार की भाजपबरोबर राहणार, याचा निर्णय झालेला नाही. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई पालिकांमध्येही हीच स्थिती आहे. या परिस्थितीमुळे उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) यांना अवकाशच मिळणार नाही, असे गणित मांडले जात आहे. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ते आग्रही आहेत. पण मतांची विभागणी आपल्यातच झाल्यास त्यांना अपेक्षित मते मिळणार नाहीत, असे भाजपला वाटते.
Mumbai Crime : गणवेशातील पोलिसाचे महिलेशी अश्लील चाळे, मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील मैदानात प्रकार, नागरिकांचा चोप
दोन्ही राष्ट्रवादींकडून चाचपणी
मुंबई/पुणेः महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास इतर प्रस्ताव खुले असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केले. मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार असल्याची चर्चा असून सुळे यांच्या वक्तव्यामुळे त्याला बळ मिळाल्याचे दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईपाठोपाठ ठाण्यातही स्वबळ अजमावण्याचे निश्चित केल्याचे संकेत पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिले आहेत. दुसरीकडे, पुण्यात अजित पवार यांनी आघाडीसाठी काँग्रेसला साद घातली आहे. पवार यांनी सोमवारी काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांना फोन करून आघाडीची चाचपणी केली.
कोणता झेंडा घेऊ हाती ?
नेत्यांचा निर्णय लवकर होत नसल्याने अनेक कार्यकत्यांची कोंडी झाली आहे. भाजपसह सर्वच पक्षांमध्ये सध्या इतर पक्षांतील कार्यकत्यांना प्रवेश देण्याचा धडाका सुरू आहे. त्या स्थितीमध्ये अनेक वर्षे प्रतिस्पर्धी राहिलेले अनेक जण एकाच पक्षात आले आहेत. त्यामुळे दुखावलेले कार्यकर्ते उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाची वाट धरण्याच्या मनःस्थितीत आहेत; पण तो निर्णय घेण्यासाठी पक्ष अंतिम निर्णय काय घेतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असून, कोणता झेंडा घेऊ हाती, अशी या सगळ्यांची स्थिती झाली आहे.
Thackeray vs Shinde: शिंदेंकडून ‘तो’ प्रश्न निकाली; ठाकरेंच्या नरेटिव्हची हवा काढली; हॅट्ट्रिकनं अनेकांची बोलती बंद
उमेदवारांची घोषणा रविवारनंतरच
सर्व महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज, मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. त्यास काही तास राहिले असतानाही अजूनही राज्यात नक्की कोणत्या पक्षांमध्ये युती होणार व कोणामध्ये आघाडी होणार, याचा निर्णय जाहीर झालेला नाही. मुंबईत शिवसेना (उबाठा) मनसे यांची युती निश्चित असली तरी जागावाटपाचे सूत्र जाहीर झालेले नाही. साहजिकच आपल्याकडचे कोणतेही उमेदवार प्रतिस्पर्धी पक्षाला मिळू नयेत, यासाठी सर्वच पक्ष सावध भूमिका घेत असून, रविवारपर्यंत कोणत्याच पक्षाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्वच पक्षांचे तळ्यात की मळ्यात असेच धोरण असून, त्याचा निकाल नक्की कधी लागणार याची चर्चा आहे.
