• Sat. Jun 13th, 2026
    Ambarnath Crime: फोन काढून घेतले, रोज रात्री खोलीत डांबलं अन् मारहाण केली; 10 मजुरांसोबत अमानुष घडलं, ‘वेठबिगारी’ने महाराष्ट्र हादरला!

    या घटनेमध्ये वेठबिगार प्रथेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठेकेदारांनी १० परप्रांतीय मजुरांना कामाचे आमिष दाखवून त्यांना कोंडून…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे, अमुलकुमार जैन: आपण २१ व्या शतकात वावरत असलो तरी आजही वेठबिगार किंवा बंधबिगार मजुरीसारखी अमानुष प्रथा सुरू असल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पश्चिम येथील ‘मे. शक्ती फूड इंडस्ट्रीज’ या कंपनीत ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानाही, जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या शोषणाच्या विळख्यातून १० परप्रांतीय कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

    नेमका प्रकार काय?

    उत्तर प्रदेशातील भदोही आणि जौनपूर जिल्ह्यातील १० कामगारांना निक्की उर्फ कृष्णा कुमार अग्रहारी आणि नितीन तिवारी या दोन ठेकेदारांनी अंबरनाथमध्ये कामासाठी आणले होते. त्यांना महिन्याला १८ ते २० हजार रुपये पगार, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयानक होती.Maharashtra TimesGirish Mahajan: ‘लव्ह, वॉर अन् इलेक्शनमध्ये सगळं माफ…!’; मंत्री गिरीश महाजनांची मित्रपक्षांना ‘गुगली’

    या कामगारांना एका लहान खोलीत कोंबून ठेवले जात असे. दिवसभर अतिशय कष्टाचे काम करवून घेऊनही त्यांना पुरेसे जेवण दिले जात नव्हते. पगार देणे तर दूरच, उलट त्यांना मारहाण केली जात होती. बाहेर कोणाशी संपर्क साधू नये म्हणून त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते आणि रात्री त्यांना ज्या खोलीत ठेवले जायचे, त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले जात असे.

    एका कामगाराच्या धाडसामुळे फुटली वाचा

    या नरकयातनेतून १७ डिसेंबर रोजी कमलेश फुन्नन बनवासी या कामगाराने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्याने थेट ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गाठले आणि आपल्यावर व इतर सहकाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना याची कल्पना दिली. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनीही निवडणुकीच्या कामाचा ताण बाजूला सारत तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

    रात्रभर चालली कारवाई

    निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमित पुरी, कामगार विभागाचे अधिकारी आणि अंबरनाथ पोलिसांच्या संयुक्त पथकाने संबंधित कंपनीवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईनंतर १० कामगारांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात ठेकेदारांवर ‘बंधबिगार उच्चाटन अधिनियम’ आणि ‘भारतीय न्याय संहिते’अंतर्गत मानवी तस्करीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या मजुरांना ‘बंधबिगार मुक्तता प्रमाणपत्र’ देऊन सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा