Nagpur Municipal Corporation: नगपुरात सध्या महानगरपालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरु आहेत. तीन वेळा सत्तेवर आल्यानंतर आता पुन्हा जिंकण्यासठी भाजपने कंबर कसली आहे.
नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ‘होमटाऊन’ आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. नगरपरिषद निवडणुकांतील घवघवीत यशानंतर भाजपमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनपा निवडणुकीसाठीची रणनीती, प्रभागनिहाय तयारी आणि उमेदवार निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भाजपकडून या निवडणुकीकडे ‘विकासाच्या अजेंड्यावर’ लढत दिली जाणार आहे. मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, रस्ते, स्मार्ट सिटी उपक्रम आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख करत भाजप मतदारांसमोर गेल्याचे चित्र आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत 151 पैकी 120 जागा जिंकण्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी वाटप हे भाजपसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. वरिष्ठ नेत्यांनी अति आत्मविश्वास टाळण्याचा सल्ला देत तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.
Nagpur Elections Results: महायुतीला ऐतिहासिक विजय, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष, नागपुरात 35 वर्षांनी पहिल्यांदाच हे घडलं
दुसरीकडे, काँग्रेससाठी ही निवडणूक पुनरुज्जीवनाची संधी मानली जात आहे. नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी यंदा महापालिकेत ‘करिश्मा’ घडवण्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना मिळालेल्या कडव्या लढतीनंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था आणि तुंबणाऱ्या गटारांचे प्रश्न काँग्रेसकडून आक्रमकपणे मांडले जाण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेना पेक्षा भाजपची टाकत मोठी आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेची ताकद विभागली गेल्याने त्यांचा प्रभाव कमी आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 108 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर काँग्रेस 29 जागांवर समाधान मानावे लागले होते. आता मात्र दीर्घकाळ सत्तेत असलेल्या भाजपसमोर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहे, तर विरोधकांसमोर सत्ताधाऱ्यांविरोधातील असंतोषाचे मतांमध्ये रूपांतर करण्याची संधी आहे.
