नगरपालिका निवडणूक निकालांनंतर महायुतीच्या कामगिरीवर चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे, शिंदे म्हणाले की…
काय म्हणाले शिंदे?
“विधानसभेप्रमाणेच महायुतीला या निवडणुकीतही लँडस्लाईड यश मिळालं आहे. असंच यश येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही महायुतीला मिळेल असे संकेत या निकालाने दिले आहेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने शतक पार केलं आहे आणि शिवसेनेने हाफ सेंच्युरी पार केली आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. कमी जागा लढवूनही जास्तीच्या जागा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या जिंकल्या आहेत, असे शिंदे म्हणाले आहेत.पुढे बाेलताना शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या एकूण जागांची बेरीज पाहता शिवसेनेच्या जागा जास्त आहेत. काही लोक म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आता या निकालांवरून स्पष्ट झालं आहे की शिवसेना ही चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी लाडक्या बहिणी-लाडक्या भावांना धन्यवाद देतो. छोट्या शहरांमध्येही शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचला. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. भाजपला मिळालेल्या यशाबद्दलही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो”
“जे लोक घरी बसतात. त्यांना राज्यातल्या मतदारांनी या निवडणुकीत घरीचं बसवलं आहे, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे”, असं म्हणत शिंदेंनी यावेळी ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान आतापर्यंतच्या निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला 34, शरद पवारांच्या एनसीपीला 7 आणि ठाकरेंच्या सेनेला 8 जागांवर विजय मिळवता आलेला आहे.
