• Sat. Jun 20th, 2026

    Eknath Shinde: नगर परिषद निवडणुकीत भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना अव्वल, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, खरी शिवसेना…

    Eknath Shinde: नगर परिषद निवडणुकीत भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना अव्वल, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, खरी शिवसेना…

    नगरपालिका निवडणूक निकालांनंतर महायुतीच्या कामगिरीवर चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे, शिंदे म्हणाले की…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: कार्यकर्त्यांची निवडणूक असलेल्या नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, आज या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातल्या अनेक ठिकाणी विविध निकाल लागलेले पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अनपेक्षित निकालही लागत आहेत. तर काही जागांवर पक्षांनी त्यांचा गड राखला आहे. पण, एकूण चित्र पाहता या निवडणुकीतही भाजप महायुतीनेच बाजी मारल्याचं चित्र आता समोर आलं आहे. 288 जागांपैकी 120 ठिकाणी भाजपला यश मिळालं आहे. तर त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना दिसत आहे. शिवसेनेने 54 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांचं संपूर्ण चित्र स्पष्ट होत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    काय म्हणाले शिंदे?

    “विधानसभेप्रमाणेच महायुतीला या निवडणुकीतही लँडस्लाईड यश मिळालं आहे. असंच यश येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही महायुतीला मिळेल असे संकेत या निकालाने दिले आहेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने शतक पार केलं आहे आणि शिवसेनेने हाफ सेंच्युरी पार केली आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. कमी जागा लढवूनही जास्तीच्या जागा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या जिंकल्या आहेत, असे शिंदे म्हणाले आहेत.पुढे बाेलताना शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या एकूण जागांची बेरीज पाहता शिवसेनेच्या जागा जास्त आहेत. काही लोक म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आता या निकालांवरून स्पष्ट झालं आहे की शिवसेना ही चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी लाडक्या बहिणी-लाडक्या भावांना धन्यवाद देतो. छोट्या शहरांमध्येही शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचला. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. भाजपला मिळालेल्या यशाबद्दलही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो”

    “जे लोक घरी बसतात. त्यांना राज्यातल्या मतदारांनी या निवडणुकीत घरीचं बसवलं आहे, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे”, असं म्हणत शिंदेंनी यावेळी ठाकरेंना टोला लगावला आहे.

    दरम्यान आतापर्यंतच्या निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला 34, शरद पवारांच्या एनसीपीला 7 आणि ठाकरेंच्या सेनेला 8 जागांवर विजय मिळवता आलेला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा