मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ भीषण अपघात झाला. दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत रोहन आणि अवंतिका लुगडे या तरुण दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीचे रहिवासी असलेले लुगडे दाम्पत्य आज दुपारी आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. कळमगावजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर एवढी भीषण धडक झाली की, या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. धडक इतकी जोरात होती की, रोहन आणि अवंतिका हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र नियतीने त्याआधीच घाला घातला होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: उज्वल निकम यांना हटवणार? ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय? 23 डिसेंबरला होणार मोठा फैसला?
महामार्ग की मृत्यूचा सापळा?
मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. यापूर्वीही याच महामार्गावर झालेल्या अनेक अपघातांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. रत्यांची दुरवस्था, अतिवेग आणि लेनची शिस्त न पाळणे यामुळे निष्पाप लोकांचे हसते-खेळते संसार काही क्षणात उद्ध्वस्त होत आहेत. लुगडे दांपत्याच्या मृत्यूने कल्याण-डोंबिवली परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला? वेगाची मर्यादा ओलांडली होती का? याचा तपास आता शहापूर पोलीस करत आहेत. मात्र, या अपघाताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, महामार्गावरचा छोटासा निष्काळजीपणा निरपराध जीवांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे.
