• Sun. Mar 8th, 2026
    Beed Crime: ‘विहीर आमची, मोटार चालू करू नकोस’; सख्या भावांमध्ये पाण्यावरून थरार, चुलत्यानं कत्ती अन् पुतण्यानं कुऱ्हाडीने….

    बीडमध्ये पाण्याच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच तडा गेला. विहिरीच्या वादातून सख्ख्या भावांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते, पण बीड जिल्ह्यात याच पाण्यासाठी सख्ख्या भाऊ एकमेकांच्या जिवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील येवता येथे विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांत झालेल्या रक्तरंजित संघर्षाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या वादात कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर करण्यात आला, दोन्ही बाजूचे लोक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी केज पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

    विहिरीच्या पाण्यावरून पेटला वणवा

    मिळालेल्या माहितीनुसार, येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते आणि त्यांचा सख्खा भाऊ अशोक लक्ष्मण सक्राते यांच्यात विहिरीच्या पाण्यावरून जुना वाद होता. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. मल्हारी शेतात असताना अशोक आणि त्याच्या मुलांनी तिथे येऊन “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत वाद उकरून काढला. मल्हारी यांनी “पाळीने पाणी घेऊ” असे सुचवले, मात्र रागाच्या भरात असलेल्या अशोकने थेट कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार केला.Maharashtra TimesThane News: सातजन्माची सोबत अर्ध्यावरच सुटली! डोंबिवलीच्या तरुण दाम्पत्याचा अपघातात करुण अंत; हायवेवर एका चुकीने…

    दुसऱ्या बाजूचा आरोप

    दुसरीकडे कत्ती आणि दगडाने मारहाण केली असे अशोकचा मुलगा प्रणव याने चुलत्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रणवच्या दाव्यानुसार, तो विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता, चुलते मल्हारी, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्याला अडवले. यावेळी झालेल्या झटापटीत मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार केला, तर इतरांनी दगडाने बेदम मारहाण केली.

    पोलीस कारवाई आणि परिसरात खळबळ या घटनेत दोन्ही गटातील लोक जखमी झाले असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मल्हारी सक्राते यांच्या फिर्यादीवरून अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर प्रणवच्या फिर्यादीवरून मल्हारी, दीपक, प्रवीण आणि शारदा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    पाण्यासाठी सख्ख्या भावांनी एकमेकांविरुद्ध शस्त्रे उपसल्याने परिसरात संताप आणि चर्चेचा विषय बनला आहे. केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा