मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची जागावाटप चर्चा सुरू झाली आहे. भाजप-शिंदेसेना एकत्र लढणार असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्याही युतीची शक्यता आहे.
मुंबईत शरद पवारांच्या पक्षाची फारशी ताकद आहे, काही मुस्लिमबहुल भागांमध्ये पक्षाचा जोर आहे. पण मुंबईत पक्षाकडे चेहरा नाही. त्यातच काँग्रेस नं स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधारा पाहता त्यांची आघाडी होईल, असा कयास होता. पण राष्ट्रवादी शपनं ठाकरे बंधूंसोबत युती करण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत २२७ प्रभाग आहेत. पैकी १५८ प्रभागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शपची आज बैठक झाली. या बैठकीला इच्छुक उमेदवार हजर होते.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे बंधूंशी युती करण्यासंदर्भात सकारात्मक आहे. पक्षाला २० ते २५ जागांची अपेक्षा आहे. मालवणी, मालाड, धारावी, वांद्रे, कुर्ला या भागातील जागा राष्ट्रवादी शपला हव्या आहेत. यासंदर्भात येत्या शुक्रवारी मुंबईत महत्त्वाची बैठक होईल. राष्ट्रवादी शप, शिवसेना उबाठा आणि मनसे यांची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीत युती संदर्भात, जागा वाटपाबद्दल चर्चा होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. १६ जानेवारीला मतमोजणी असेल.
राष्ट्रवादी शपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मविआनं एकत्रित निवडणूक लढवावी असा आमचा प्रयत्न आहे. आमचा मानसन्मान राखला जावा. पुरेशा जागा मिळाव्यात, हीच आमची अपेक्षा आहे. २१ तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी आम्ही काँग्रेसलादेखील बोलावू. सगळ्यांशी चर्चा करु. सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. मनसेला ७, काँग्रेसला ३१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागांवर समाधान मानावं लागतं. २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं. २०२३ मध्ये हाच प्रयोग अजित पवारांनी केला. मागील साडे तीन वर्षांत अनेक माजी नगरसेवकांनी पक्ष बदलले. सध्या भाजपकडे ८७, शिंदेसेनेकडे ६३ माजी नगरसेवक आहेत. तर ठाकरेसेनेकडे ४७, काँग्रेसकडे २१, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे माजी नगरसेवक आहेत. तर मनसेकडे एकही माजी नगरसेवक नाही.
