• Mon. Mar 16th, 2026
    Sangli News: ‘महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र, दोन दिवसांत जागावाटप…’; जयंत पाटील

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येत सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक एकसंघपणे लढवणार असल्याची माहिती जयंतराव पाटील यांनी दिली. सांगली शहराला मागे नेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून शहराच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. शहरासमोरील विविध प्रश्नांवर संयुक्तपणे लढा देत विकास साधण्याचा महाविकास आघाडीचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील दोन-तीन दिवसांत जागावाटपाबाबत चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.

    जयंतराव पाटील पुढे म्हणाले की, नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल अद्याप प्रलंबित असताना पुढील निवडणुका जाहीर करण्याचे धोरण दिसून येत आहे. एका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पुढील निवडणूक जाहीर करणे अपेक्षित आहे. तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी ईव्हीएमबाबत छेडछाडीची शंका नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे मतमोजणी पुढे ढकलायला नको होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    चित्रपटालाही लाजवेल असा थरार! वाशिममध्ये पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये सिनेस्टाईल अ‍ॅक्शन, अपहरणाचा मोठा गुन्हा उघड

    विशाल पाटील यांचा डीएनए काँग्रेसचा असल्याने ते महाविकास आघाडीसोबतच असल्याचे जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सांगली महापालिका निवडणुकीचे नेतृत्व विशाल पाटील यांच्याकडे असेल, असेही त्यांनी सांगितले.

    दरम्यान, सभागृहात बोलताना आपल्याकडून अपशब्द वापरला गेल्यामुळे जर नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आपण मनापासून माफी मागत असल्याची भावना जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

    तसेच तपोवन परिसरातील झाडे तोडून भविष्यात काही प्रकल्प उभारण्याची स्वप्ने काही जण पाहत असतील, तर ती कधीही प्रत्यक्षात उतरणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. यापूर्वीही कुंभमेळा नाशिकमध्ये झाला असून नाशिककरांसाठी ते नियोजन नवीन नाही, असे त्यांनी सांगितले.

    जंगलतोडीमुळेच बिबट्यांचा वावर वाड्या-वस्त्यांमध्ये वाढत असून त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा परिस्थितीत अधिक झाडतोड होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जयंतराव पाटील यांनी यावेळी केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *