• Fri. Mar 6th, 2026
    रहिवासी सोसायटी बनवण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरवर कठोर कारवाई होणार, विधान परिषदेत विधेयक मंजूर

    रहिवासी सोसायटी बनवण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरवर आता कठोर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. विधान परिषदेत याबाबत आज विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

    प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नागपूर : रहिवासी सोसायट्यांमध्ये उद्भवणाऱ्या वादांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने विकासकाची जबाबदारी निश्चित केली आहे. लहान इमारतींचे निर्माण केल्यानंतर अनेक विकासक रहिवासी सदस्यांची सोसायटी स्थापन करून देत नाहीत. यामुळे, लहान-लहान गोष्टींवरून मोठे वाद उद्भवतात. भविष्यात विकासकाने लहान गाळेधारकांची सोसायटी स्थापन न केल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेले विधेयक शनिवारी विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले.

    गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी ‘महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०२५’ हे विधेयक परिषदेमध्ये मांडले. आठ सदनिका असलेल्या लहान लहान इमारती विकासक तयार करतो. परंतु, त्याचे मालकी हक्काच्या दृष्टीने सोसायटी तयार करीत नाही. या मालमत्तांना या इमारती स्थावर मालमत्ता व विकास (रेरा) कायद्यात येत नसल्याने विकासकावर कुठलीही कारवाई होत नाही. परंतु, या विधेयकानंतर इमारतीमधील सर्व सदस्य एकत्रित आल्यास त्यांना सोसायटी तयार करून देणे विकासकाला बंधनकारक राहणार आहे. अर्थात त्याला रेरा कायदा लागू होईल.

    या कायद्यामध्ये तुरुंगवासाची तरतूद असून विकासकाने लहान लहान इमारतींच्या गाळेधारकांची सोसायटी स्थापन करून न दिल्यास विकासकावर आता गुन्हे दाखल होणार आहे. या विधेयकामुळे लहान लहान संपत्तीधारक आणि गाळेधारकांना संरक्षण मिळणार आहे. या चर्चेमध्ये सचिन अहिर, अभिजित वंजारी, सुनील शिंदे आदी सहभागी झाले होते.
    Maharashtra Timesएकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्या, अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

    अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांची टीका

    दरम्यान, आठवडाभराच्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी विरोधकांनी विधानपरिषदेत आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असल्याचा दिखावा करते. मात्र, प्रत्यक्षात चर्चेच्या वेळी सभागृहात कृषी खात्याचे मंत्री व राज्यमंत्री गैरहजर आहेत. यावरून सरकारच फारसे गंभीर नसल्याचा आरोप करीत विरोधकांनी टीका केली. यावेळी भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या मुद्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
    Maharashtra TimesNagpur : नागपुरात शिक्षण समितीचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली, विधान भवनाबाहेर प्रचंड आक्रोश
    “राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या ८४ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, यातील निधी अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पालघरमधील एका शेतकऱ्याच्या खात्यात २ रुपये ३० पैसे जमा होतात. दुसरीकडे उद्योजकांचे १ हजार ६०० कोटी रुपये माफ करण्यात येतात. विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची आहे”, अशी टीका विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना काँग्रेसचे सतेज पाटील यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा