कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदेसेनेतील स्थानिक पातळीवरील संघर्षानंतर वरिष्ठ पातळीवर महापालिका निवडणुकीत युतीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली असून, पक्षांतर केलेल्या नेत्यांची कोंडी झाली आहे.
सध्या नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी नागपुरात रात्री भाजप आणि शिंदेसेनेत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.
Vasai Virar Politics: ठाकरेंनंतर आणखी एक कुटुंब अडचणीत; 115 पैकी 106 जागा जिंकणारा पक्ष कोंडीत, भाजपशी सलगी महागात?
नगर परिषद आणि नगर पंचायतीत भाजप आणि शिंदेसेनेची बहुतांश ठिकाणी युती झाली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना तिकिटं मिळाली. महापालिकेतही दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील, असा कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचा अंदाज होता. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांनी कल्याण-डोंबिवलीत एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडले. दोन्ही पक्षांचा पवित्रा पाहता त्यांनी स्वबळाची तयारी सुरु केल्याचं दिसत होतं. पण आता अचानक वरिष्ठ पातळीवरुन युतीचा निर्णय झाल्यानं स्थानिक नेत्यांची, इच्छुकांची गोची झाली आहे.
महापालिकेसाठी युतीचा निर्णय झाल्यानं आता अनेक इच्छुकांना त्यांच्या मनातील आशा आकांक्षांना मुरड घालावी लागेल. प्रभाग मित्रपक्षाला सुटल्यास त्यांच्या उमेदवाराचं काम करावं लागेल. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील इच्छुकांमध्ये नाराजीची भावना आहे. डोंबिवलीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस, ठाकरेसेना आणि मनसेच्या माजी नगरसेवकांना आता आपल्याला तिकीट मिळेल का, याची चिंता सतावू लागली आहे.
Eknath Shinde: शिंदेंच्या बंडावर पुस्तक; थेट गुवाहाटी गाठणारा नेता ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’वर लिहिणार
गेल्या काही महिन्यांत शिंदेसेनेत भाजप, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केले. काही स्थानिक राजकीय कुटुंबांनी शिंदेसेनेची वाट धरली. त्या कुटुंबांपैकी दोन किंवा जास्त तिकिटं हवी असलेली मंडळी हवालदिल झालेली आहेत. आधी वरिष्ठ पातळीवरुन चढाओढ, फोडाफोड सुरु असल्यानं युती होणार नाही, अशी शक्यता निर्माण झालेली होती. तीच शक्यता गृहित धरुन अनेकांनी पक्षांतरं केली. पण आता युतीचा निर्णय झाल्यानं पक्षांतरं केलेले स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार कोंडीत सापडले आहेत.
