• Sat. Jun 6th, 2026
    ऊस दरावरून शेतकरी संतप्त! खासदार प्रणिती शिंदेंवर स्वाभिमानी शेतकऱ्यांचा जोरदार रोष, सिद्धेश्वर कारखान्यासमोर मोठं आंदोलन

    सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांनी ऊसाची पहिली उचल….

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: सोलापूर शहराजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या समोर गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही एकही सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. या कारणावरुन शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 38 साखर कारखाने असूनही शेतकऱ्यांना आपले हक्क मिळत नसल्याची तक्रार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली पाहायला मिळत आहे.

    उसाची पहिली उचल ३,४०० रुपये जाहीर करावी, अशी मागणी करत शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखान्याच्या गेटवर आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, सोलापूरच्या मतदारसंघातील खासदार प्रणिती शिंदें यांनी केंद्रीय संसदेत एक शब्दही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उचलला नाही. ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesBadlapur Local: प्रचंड गर्दी अन् रेटारेटीत लोकल प्रवास करणाऱ्या बदलापूरकरांना दिलासा नाहीच, रेल्वेचे उत्तर वाचले का?

    विधानसभेतही सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदारांनी शेतकऱ्यांसाठी कोणताही लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला नाही. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आरोप केला की, आमदार असो किंवा खासदार असो, त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा फक्त साखर कारखान्यांच्या पोसणावर लक्ष केंद्रित आहे, अशी टीका विजय रणदिवे आणि मोहसीन पटेल यांनी केली.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय रणदिवे म्हणाले की, ऊस कायदा १९६६ नुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत बिल जमा करणे बंधनकारक आहे. परंतु सध्या ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक वेळ उलटला असूनही ऊसदर जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांना पहिली उचल ३,४०० रुपये देण्यात यावी, अशी मागणी करत संघटनेने आंदोलन केले आहे.

    या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा सार्वजनिक समोर आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आक्रोश व्यक्त करत कारखान्यांना आपले हक्क त्वरित देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा हा रोष आणि कारखान्यांविरुद्धचा दबाव पुढील दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा