• Tue. Mar 10th, 2026

    ठाकरेंनंतर आणखी एक कुटुंब अडचणीत; 115 पैकी 106 जागा जिंकणारा पक्ष कोंडीत, भाजपशी सलगी महागात?

    ठाकरेंनंतर आणखी एक कुटुंब अडचणीत; 115 पैकी 106 जागा जिंकणारा पक्ष कोंडीत, भाजपशी सलगी महागात?

    वसई-विरार महापालिका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपने दोन जागा जिंकल्या. या अनुकूल परिस्थितीत भाजप बविआच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी सज्ज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विरार: एमएमआर पट्ट्यातील महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर-कुळगाव, मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. वसई-विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपनं फिल्डींग लावली आहे. विशेष म्हणजे यंदा भाजपसाठी इथली परिस्थिती बऱ्यापैकी अनुकूल आहे.

    वसई-विरार महापालिका पालघर जिल्ह्यात येते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची धूळधाण उडाली. पण पालघरची जागा भाजपनं जिंकली. हेमंत सावरा इथले खासदार आहेत. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत विधानसभेचे तीन मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघांमध्ये २०१४ ते २०२४ या कालावधीत बविआचे आमदार होते. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर वसईचे, त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर नालासोपाऱ्याचे, तर विलास तरे बोईसरचे आमदार होते. पण ठाकूर पितापुत्रांचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. हा ठाकूर यांच्या राजकारणाला मोठा धक्का मानला गेला.
    Maharashtra TimesEknath Shinde: भाई ‘मोदी पॅटर्न’साठी आग्रही; देवाभाऊ अन् दादांचा वेगळा सूर; महायुतीमधील हालचालींनी ठाकरेंना धक्का?
    विशेष म्हणजे नालासोपारा आणि वसईत भाजपला यश मिळालं. नालासोपाऱ्याची जागा राजन नाईक यांनी, तर वसईची जागा स्नेहा दुबे पंडित यांनी जिंकली. ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला विधानसभेत हादरा दिल्यानंतर भाजपनं पालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकूर यांच्या बविआची पालिकेवर असणारी एकहाती सत्ता गेल्यास त्यांचं राजकारण अडचणीत येईल. मुंबई महापालिका जशी ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे, तसंच गणित वसई-विरारच्या बाबतीत ठाकूर यांचं आहे.

    वसई-विरारमध्ये भूमिपुत्र आणि उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजपसाठी अनुकूल स्थिती आहे. त्यातच कधी नव्हे ते विधानसभेला भाजपचे आमदार इथून निवडून आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं राज्यात २ कोटी सदस्य जोडून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. ते अभियान वसई-विरारमध्ये अतिशय जोरकसपणे राबवण्यात आलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत.
    Maharashtra TimesEknath Shinde: शिंदेंच्या बंडावर पुस्तक; थेट गुवाहाटी गाठणारा नेता ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’वर लिहिणार
    वसई-विरार महापालिकेची अखेरची निवडणूक २०१५ मध्ये झाली. तेव्हा ठाकूर यांच्या बविआनं ११५ पैकी १०६ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. वसई-विरारमधील भाजपची ताकद वाढलेली आहे. तर ठाकूर यांच्या वर्चस्वाला बऱ्यापैकी शह बसलेला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची असेल.

    २०२२ मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळण्याआधी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपनं संख्याबळ नसतानाही अधिकचे उमेदवार निवडून आणले. त्यासाठी त्यांनी मविआचे आमदार गळाला लावले. सोबतच छोट्या पक्षांचीदेखील मदत घेतली. त्यात बविआचाही समावेश होता. पण अडीच वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनंच बविआच्या तीनपैकी तीन जागा पाडत विजय मिळवला. यानंतर आता भाजप बविआला महापालिकेत शह देण्यासाठी तयारीला लागला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा