• Sat. Mar 7th, 2026

    मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी, अनेक विमानं रद्द, नेमकं कारण काय?

    मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी, अनेक विमानं रद्द, नेमकं कारण काय?

    मुंबई विमानतळावरुन मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई विमानतळावर अनेक विमानं रद्द झाल्याने प्रवाशांची गर्दी झाली आहे. इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफमुळे अनेक विमानं रद्द झाली आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफने अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कॅबिन क्रू आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये वाद झाला आहे. या वादाचा फटका प्रवाशांना बसताना दिसतोय. इंडिया एअर लाईन्सच्या स्टाफच्या संपामुळे अनेक विमानं रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

    विशेष म्हणजे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका केवळ मुंबईत होताना दिसत नाही, तर नाशिकमधून देखील याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये देखील इंडिगो कंपनीचे अनेक कर्मचारी रजेवर गेल्याने विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. नाशिक विमानतळावरील सायंकाळचे नवी दिल्लीला जाणारं विमान रद्द करण्यात आलं आहे. तसेच अन्य सर्व विमाने उशिरा असल्याची माहिती मिळत आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या कॅबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफने अचानक कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिफ्ट वाटप आणि ड्युटी तासांबाबत मॅनेजमेंटसोबत सुरू असलेल्या वादातूनच हे आंदोलन उफाळून आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

    आंदोलनामुळे इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स उशिराने सुरू होत आहेत, तर काही फ्लाइट्स रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांची मोठी कोंडी झाली आहे. तिकीट तपासणी काउंटर, सुरक्षा तपासणी विभाग आणि बोर्डिंग गेट परिसरात प्रवाशांनी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेकजण आपापल्या फ्लाइट्स चुकण्याच्या भीतीने अस्वस्थ दिसत आहेत.

    प्रवाशांचे म्हणणे आहे की एअरलाईन्सकडून योग्य माहिती मिळत नसल्याने अनिश्‍चितता वाढत आहे. फ्लाइट उशिराची सूचना सतत बदलत असल्याने नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली असून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

    दरम्यान, इंडिगो व्यवस्थापनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून चर्चा सकारात्मक दिशेने जात असल्याची माहिती मिळत आहे. तथापि, आंदोलनामुळे विमानतळावरील कार्यव्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले असून सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा