• Sat. Mar 7th, 2026
    2 दिवसांत तब्बल 1600 स्वयंसेवक प्रवासी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली सिम्युलेशन चाचणी यशस्वी

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली सिम्युलेशन चाचणी यशस्वी झाली आहे. यानंतर आता येत्या 25 डिसेंबरला पहिले व्यावसायिक उड्डाण होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) पहिली प्रवासी सिम्युलेशन चाचणी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 29 आणि 30 नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल 1600 स्वयंसेवकांनी प्रवासी म्हणून सहभाग घेत विमानतळाच्या सर्व सेवांची कसून परीक्षा घेतली. विमानतळ प्रशासनाने या चाचणीचे व्हिडिओदेखील सार्वजनिक केले असून देशभरातील विमानप्रेमी आता एका तारखेकडे आतुरतेने पाहत आहेत. 25 डिसेंबर, ज्या दिवशी या अत्याधुनिक विमानतळावरून पहिले व्यावसायिक उड्डाण होणार आहे.

    या चाचणीत प्रवेशद्वारापासून ते विमानतळाबाहेर पडण्यापर्यंतच्या प्रत्येक प्रक्रियेचे वास्तवदर्शी परीक्षण करण्यात आले. चेक-इन काउंटरवर रांगेचे व्यवस्थापन, सुरक्षा तपासणीतील शिस्त, बोर्डिंग गेटवरील हालचाल, तसेच बॅगेज क्लेम विभागातील कार्यक्षमता अशा सर्व घटकांवर विशेष भर देण्यात आला. बॅगेज बेल्टवर सतत चालणाऱ्या ट्रॉली, गेटवर प्रवाशांचा ओघ आणि कर्मचारीवर्गाचे नियोजन यामुळे सिम्युलेशनचा अनुभव वास्तवातील उड्डाणासारखाच झाला.

    या प्रक्रियेत इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने चाचणी अधिक प्रभावी ठरली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विविध प्रवर्गातील लोकांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन विमानतळाच्या सुविधांची उद्दिष्टपूर्ती तपासली.
    Maharashtra Times‘आम्हाला खडसेंचं चॅलेंज नाही, ते 2019 मध्येच संपले’, शिवसेनेच्या संजना पाटील यांचं वक्तव्य
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला झालेल्या उद्घाटनानंतरची ही पहिली मोठी कार्यात्मक चाचणी यशस्वी ठरल्याने विमानतळाच्या पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये मुंबई विमानतळाचा मोठा प्रवासीभार कमी करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, येथे देशातील इतर विमानतळांच्या तुलनेत सर्वात कमी वेळेत बॅगेज क्लेम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    Maharashtra Timesनाना पटोले यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचे संकेत, बावनकुळे म्हणाले….
    संपूर्ण नवी मुंबई आणि परिसराच्या विकासाला नवे पंख देणारा हा विमानतळ आता प्रत्यक्ष ‘उड्डाणासाठी सज्ज’ झाल्याचे चित्र या यशस्वी चाचणीमुळे स्पष्ट झाले आहे. येत्या 25 डिसेंबर रोजी होणारे पहिले व्यावसायिक उड्डाण शहरासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा