• Sun. Mar 8th, 2026

    Jalna Crime: घरासमोर येऊन बाप-लेकाला गाठलं; जुन्या वादामुळे बेदम मारहाण, लेकराच्या डोळ्यांदेखत बापाचा दुर्दैवी मृत्यू

    Jalna Crime: घरासमोर येऊन बाप-लेकाला गाठलं; जुन्या वादामुळे बेदम मारहाण, लेकराच्या डोळ्यांदेखत बापाचा दुर्दैवी मृत्यू

    Jalna man killedघनसावंगी तालुक्यातील शेवता शिवारात झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी वडील आणि मुलावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला.

    योगेश काकफळे, जालना: जिल्ह्यात तब्बल तीन खून दिवसाढवळ्या झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यातीलच सर्वात धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील शेवता शिवारात घडली. मागील भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने वडील आणि मुलाला लाठ्या–काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात 55 वर्षीय लक्ष्मण कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    शेवता येथील लक्ष्मण कांबळे आणि त्यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांचा आरोपींशी यापूर्वी छोट्या–मोठ्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे भांडणात झाले. त्याच रागातून 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारास सहा जणांनी त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत काठ्यांनी भयंकर मारहाण केली. हल्ला इतका जबरदस्त होता की लक्ष्मण कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.

    Maharashtra TimesJalna News: चेकपोस्टवर ट्रक चालकाचा मृत्यू, आरटीओ पोलिस अधिकाऱ्यांवर मुलाचा गंभीर आरोप, जालन्यात तणाव

    लक्ष्मण कांबळे जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढली. ही बातमी क्षणात गावभर आणि मग जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

    या प्रकरणी शशिकांत कांबळे (वय 35) यांच्या फिर्यादीवरून आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सहा जणांविरुद्ध तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींत 1) राहुल सखाराम सोनवणे, 2) विकास सखाराम सोनवणे, 3) सखाराम विश्वनाथ सोनवणे, 4) कमलबाई सखाराम सोनवणे, 5) अनिता राहुल सोनवणे आणि 6) कल्पना विकास सोनवणे यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

    नगरपरिषद निवडणुकीत ओबीसी मतदारांनी फक्त ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं : वाघमारे

    या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच जिल्ह्यात सतत होत असलेल्या हल्ले, वाद, खून–खराब्यामुळे जालना जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. छोट्या–मोठ्या कारणांवरून नागरिक थेट जीवघेण्या हिंसेकडे वळत असल्याचे चित्र भयावह आहे. सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे अत्यंत गरजेचे असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा