• Sat. Jun 6th, 2026
    ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक’, नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंचं डहाणूत मोठं वक्तव्य

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी डहाणूत आपल्या भाषणात भाजपचा कुठेही उल्लेख केला नाही. तसेच आपल्याकडे असणाऱ्या खात्यांच्या माध्यमातून आपण काय कामे करु, याबाबत आश्वासने दिली. तसेच त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर : उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांची आज डहाणूत सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माछी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपण मुख्यमंत्री असताना काय-काय कामे केली, याबाबत भाष्य केलं. तसेच आपल्याकडे असणाऱ्या खात्यांच्या माध्यमातून डहाणूत कशाप्रकारे विकास करु? याबाबतही शिंदेंनी डहाणूकरांना आश्वासन दिलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलेल्या भाषणात त्यांचं एक वक्तव्य चर्चेला कारण ठरलं आहे. रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नाराजीनाट्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी भाजपवर तर टीका केली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

    “तुमच्या एकनाथ शिंदेने फक्त 80 जागा लढवून विधानसभेच्या 60 जागा जिंकल्या. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतोय, आपल्याला खऱ्या अर्थाने या भागाचा विकास हवा असेल तर राजू माछी आणि त्यांच्या टीमला विजयी करायचं आहे. त्यामुळे हे 2 तारखेचं पुण्याचं काम आपण केलं पाहिजे. बाकी तुम्ही एक दिवस मतदानासाठी काढा. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतोय, तुम्ही डोळ्यांत तेल घालून काम करा. सगळी कामे बाजूला ठेवा. विकास हे एकच नाव डोळ्यांसमोर ठेवा. तुम्हाला आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर इथे विकासाशिवाय पर्याय नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “किनारपट्टीलगत असलेल्या मच्छिमारांची घरे नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे. तो देखील निर्णय आम्ही घेणार आहोत. कारण नव्या मुंबईतही आम्ही नियमाकुल करण्याचं काम एकनाथ शिदेने केलं. मी तुम्हाला शब्द देतो, नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. पार्क मंजूर केल्याशिवाय राहणार नाही. 1985 पासून इथे नगर परिषद अस्तित्वात आहे. पण आजतागत नगर परिषद भवन नाही. म्हणजे भाडावर आहे? बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत. निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार. जिंथून लोकांना न्याय मिळेल ते नगर परिषद भवन दिलं जाईल”, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं.

    “अरे लोकांना गार्डन पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी मैदान पाहिजे. हे देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. झेपीझाडांचं आधुनिकरण केलं जाईल. कारण शिक्षण महत्त्वाचं आहे. प्रत्येक विभागात क्लिनिक सुरु करु. मी मुंबईमध्ये प्रत्येक भागात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आहे. तसे दवाखाने डहाणूत सुद्धा चालू करु. सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे. प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यांनादेखील मी सूचना देत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “तरुणांसाठी मल्टिस्पोर्ट ग्राऊंड आवश्यक आहे. तरुणांना जीवनाचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. हाऊसिंगच्या माध्यमातून, गृहनिर्माणच्या माध्यमातून प्रकल्प उभे केल्याशिवाय राहणार नाही असा मी आपल्याला शब्द देतो. प्रदूषणमुक्त उद्यग धोरण राबवून रोजगार निर्मिताला चालना देऊ. उद्योगमंत्री उदय सामंत यांना मी बैठक घेण्याचं बोललो आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

    ‘आपण सर्वजण एकाधिकारशारही विरोधात एकत्र’

    “मी आपल्याला एवढंच सांगतो, डहाणूत आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र आलेला आहात. अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेला आहात. रावणाचा अंहकार होता. पण रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली. तुम्हाला 2 तारखेला तेच करायचं आहे, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा आहे. या ठिकाणी विकासाला आणायचं आहे”, असंदेखील शिंदे म्हणाले.

    “जमिनीशी जोडलेला, अतिशय गरीब, मेहनती आणि गरिबांसाठी रात्रं-दिवस उपलब्ध असलेला राजू मी तुम्हाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे येत्या 2 तारखेला राजू माछी यांची निशाणी धनुष्यबाण आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे ज्या ज्या निशाणा आहेत त्या सर्वांवर आपल्याला शिक्का मारायचा आहे”, असं ते म्हणाले.

    “मी लाडक्या बहिणींना एकच सांगतो. तुम्ही चमत्कार घडवू शकतात. तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेला पाहिलेला आहे. विरोधकांनी सर्व स्वप्ने पाहिली होती. पण तुम्ही त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. डहाणू तर तुमच्यासाठी सोपं आहे. मला काही व्यापारी भेटले. त्यांनाही डहाणूमध्ये परिवर्तन पाहिजे. हे परिवर्तनाची नांदी डहाणूत सुरु झाली आहे. दोन तारखेला सर्वांनी एक दिवस द्या. राजू माछी आणि त्यांचे सहकारी पाच वर्ष सर्वांची सेवा करतील हा शब्द देतो”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण संपवलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा