सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपने शिंदेसेनेचे नगरसेवक फोडल्याने अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही.
कल्याण-डोंबिवलीत भाजपनं शिंदेसेनेचे माजी नगरसेवक फोडले. त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेवर वर्चस्व राखलं आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांबद्दल शिंदे कायमच संवेदनशील राहिले आहेत. या ठिकाणी सेनेच्या विरोधात घडामोडी घडल्यास शिंदे अस्वस्थ होतात, याची जाणीव भाजपला आहे. कल्याण-डोंबिवलीत तर शिवसेना-भाजपच्या संघर्षाची पुनरावृत्ती सुरु झाली आहे. दोन्ही पक्ष सत्तेत असताना कल्याण-डोंबिवलीत तणाव वाढल्याचा प्रकार याआधी ८ वर्षांपूर्वी घडला आहे.
ठाण्यात रविंद्र, मंत्रालयात देवेंद्र; CMच्या एका खेळीनं शिंदेसेनेत खळबळ; तोच खेळ पुन्हा सुरु
२०१४ मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं. एकसंध असलेली शिवसेना काही महिन्यांनी सत्तेत सहभागी झाली. सेनेला उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची खाती मिळालेली नव्हती. २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाली. कल्याण-डोंबिवलीत भाजप एकला चलो रेची भूमिका घेईल, अशी कल्पना शिंदे यांनी केली नव्हती. त्यावेळी शिंदे युती सरकारमध्ये मंत्री होते. ठाणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
२०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात मिळालेली सत्ता यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्चस्व असलेल्या भागात त्यांनी एक बैठक घेतली. त्यानंतर भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढेल, अशी घोषणा झाली. त्याआधी आमदार रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा शहरात सक्रिय होते. भाजपची शहरातील ताकद पाहता त्यांच्याकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असं शिंदे यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. हा शिंदे यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.
महाशक्ती पाठिशी ते महाशक्ती लागली पाठी! शिंदेसेना अडचणीत; भाईंकडे आता एकच पर्याय
भाजपची फारशी ताकद नसतानाही कल्याण-डोंबिवलीत जोरदार संघर्ष झाला. त्याच निवडणुकीत फडणवीस यांनी ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात, जात ही आमुची, पहा चाळून पाने आमुच्या इतिहासाची,’ अशा शब्दांत शिवसेनेला आव्हान दिलं. युती तुटलेली असल्यानं शिंदे यांनीही आपली सगळी ताकद पणाला लावली. एका प्रचारसभेत तर शिंदे यांनी त्यांचे तेव्हाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यासपीठावर राजीनामा दिला होता. शिवसैनिकांवर अन्याय होतोय, तो मी पाहू शकत नाही. अन्याय करणाऱ्यांसोबत मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, असं शिंदे तेव्हा जाहीर सभेत म्हणाले होते.
२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ५२ जागा जिंकल्या. तर भाजपनं ४२ जागांवर बाजी मारली. सेनेच्या २१, तर भाजपच्या ३३ जागा वाढल्या. या निवडणुकीत भाजपची वाढलेली ताकद दिसली. गेल्या १० वर्षांत तर भाजपची ताकद आणखी वाढली आहे. त्याची पूर्ण कल्पना शिंदेंना आहे. त्यामुळेच ते युतीसाठी आग्रही आहेत. पण भाजपनं कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेच्याच माजी नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. २०१५ मध्ये शिंदे सेनेचे मंत्री होते. आता ते पक्षाचे प्रमुख आहेत. परिस्थिती खूप बदलली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे काय करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
