महायुतीमधील फोडाफोडीचं राजकारण अजूनही संपलेलं नाही. पुण्यात तर शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षप्रवेश दिला आहे. त्यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यनंतर भाजप आणि शिवसेनेतली वाद कुठेतरी मिटतोय असं दिसत असताना महायुतीतील दुसरा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांना भोरमध्ये जोरदार धक्का दिला आहे. यावेळेस नगरसेवक किंवा नेता नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवाराने अर्ज दाखल केला त्याच उमेदवाराला अजित पवार यांचे आमदार शंकर मांडेकर यांनी गळाला लावत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळालं. या उमेदवार पळवा पळवीवर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पाळवा पाळवीच्या राजकारणाला जनता उत्तर देईल. राष्ट्रवादी काँग्रेसने कुठेतरी काहीतरी केले म्हणून आम्ही नाराज होणार नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय मैदानामध्ये खेळत असतो आणि सतर्क देखील असतो. त्यामुळे कोणी कोणाचा उमेदवार घेतला म्हणून आमचा पक्ष संपत नाही. आम्ही संघर्षातून मोठे झालेला आहोत. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींची आम्हाला विचार करायची गरज नाही”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नागपूरमध्ये भूकंप, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा
दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीवर सुद्धा उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एनडीएमध्ये एकनाथ शिंदे हे तीन नंबरचे नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर जेव्हा भेटतात तेव्हा ते एनडीएचे प्रमुख नेते म्हणून भेटत असतात. त्यामुळे ते तक्रार करण्यासाठी भेटले हे म्हणणं चुकीचं आहे. शिंदे हे तक्रार करणारे नेते नसून हे सोल्यूशन काढणारे नेते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका दिल्लीमधून स्पष्ट केली आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
दरम्यान, “महायुतीमधील प्रमुख तीन पक्षांतील वरिष्ठांनी युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला बॉण्ड खूप मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणीही मिठाचा खडा टाकायला जाऊ नये. त्यांच्यामध्ये वाद लागणार नाही. शिंदे यांनी यापूर्वीच आपल्या पक्षातील नेत्यांना सांगितलं आहे. भाजपमधून शिवसेनेत कोणताही नेत्यांना प्रवेश द्यायचे नाहीत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षांना सूचना दिल्यास शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश होणार नाहीत”, असं सामंत म्हणाले.
“युतीमध्ये आमची जी काही नाराजी होती. ती आम्ही दोनच व्यक्तींकडे मांडू शकतो. एक म्हणजे शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि दुसरे राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस. त्यामुळे त्याच पद्धतीने आमची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवली असून त्यातून मार्ग निघाला आहे”, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

