• Sat. Mar 7th, 2026
    कल्याण डोंबिवलीत ‘ऑपरेशन लोटस’, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले, ‘शिवसेना भक्कम’

    कल्याण डोंबिवली पक्षातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षप्रवेश दिल्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता कल्याण ग्रामीणचे शिवसेनेच आमदार राजेश मोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने फासे टाकायला सुरुवात केली आहे. भाजपने ऑपरेशन लोटस राबवायाला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकापाठोपाठ माजी नगरसेवकांना आणि विविध पक्षातील मान्यवरांना भाजप पक्षात प्रवेश करून घेत आहेत. त्यामुळे विरोधकांसह युतीमधील शिवसेना शिंदे गटाला सुद्धा सुरुंग लावलाय. शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

    या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. गेल्या काही तासांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप शिवसेनेला धक्का देणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपमध्ये नेमके कोणते नगरसेवक प्रवेश करणार, याची माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळाला या पक्षप्रवेश सोहळ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. विशेष म्हणजे मुंबईमधील मीडिया डोंबिवलीत ठाण मांडून होती.

    एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासूनच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष हा सर्वश्रुत आहे. या दोन्ही पक्षांमधली वाद विकोपालाही गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होताच भाजपने पुन्हा एकदा ताकद दाखवायाला सुरुवात केली आहे. भाजप पदाधिकारी हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. त्यादृष्टीने भाजप पद्धतशीरपणे पावले टाकत असल्याचे सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून कल्याण-डोंबिवली इतर पक्षातील नेत्यांना आयात करुन आपली संघटनात्मक ताकद वाढवली जात आहे. मात्र, मंगळवारी शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांना गळाला लावल्याने खळबळ उडाली आहे.

    आमादार राजेश मोरे काय म्हणाले?

    दरम्यान, शिवसेनेने पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. “प्रथम आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेलेल्यांना लाख लाख शुभेच्छा. शिवसेना पक्ष भक्कम आहे. केंद्रात, राज्यात महायुती सत्ता असताना फोडाफोडी करताना त्यांनी विचार केला पाहिजे. महापालिका, नगरपालिकेच्या निवडणूक आल्या की मित्र पक्ष नेहमीच आम्हाला त्रास देण्याचे काम करतो. 2015 मध्ये तेच केलं. पण आम्ही सक्षम आहोत. आम्हाला गेले काय, आले काय, फरक पडत नाही”, असे आमदार मोरे यांनी सांगितले.

    आमदार राजेश मोरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. “ते मित्र आहेत. मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भाजपने मैत्रीपूर्वक संबंध ठेवले नाही का? असा प्रश्न विचारला असता, “आपण पुढे बघुयात काय होते ते”, असं वक्तव्य राजेश मोरे यांनी केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा