कल्याण डोंबिवली पक्षातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षप्रवेश दिल्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता कल्याण ग्रामीणचे शिवसेनेच आमदार राजेश मोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. गेल्या काही तासांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप शिवसेनेला धक्का देणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपमध्ये नेमके कोणते नगरसेवक प्रवेश करणार, याची माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळाला या पक्षप्रवेश सोहळ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. विशेष म्हणजे मुंबईमधील मीडिया डोंबिवलीत ठाण मांडून होती.
एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासूनच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष हा सर्वश्रुत आहे. या दोन्ही पक्षांमधली वाद विकोपालाही गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होताच भाजपने पुन्हा एकदा ताकद दाखवायाला सुरुवात केली आहे. भाजप पदाधिकारी हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. त्यादृष्टीने भाजप पद्धतशीरपणे पावले टाकत असल्याचे सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून कल्याण-डोंबिवली इतर पक्षातील नेत्यांना आयात करुन आपली संघटनात्मक ताकद वाढवली जात आहे. मात्र, मंगळवारी शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांना गळाला लावल्याने खळबळ उडाली आहे.
आमादार राजेश मोरे काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेनेने पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. “प्रथम आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेलेल्यांना लाख लाख शुभेच्छा. शिवसेना पक्ष भक्कम आहे. केंद्रात, राज्यात महायुती सत्ता असताना फोडाफोडी करताना त्यांनी विचार केला पाहिजे. महापालिका, नगरपालिकेच्या निवडणूक आल्या की मित्र पक्ष नेहमीच आम्हाला त्रास देण्याचे काम करतो. 2015 मध्ये तेच केलं. पण आम्ही सक्षम आहोत. आम्हाला गेले काय, आले काय, फरक पडत नाही”, असे आमदार मोरे यांनी सांगितले.
आमदार राजेश मोरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. “ते मित्र आहेत. मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भाजपने मैत्रीपूर्वक संबंध ठेवले नाही का? असा प्रश्न विचारला असता, “आपण पुढे बघुयात काय होते ते”, असं वक्तव्य राजेश मोरे यांनी केलं.

