पुण्यातील नवले पूल परिसरात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० ते २५ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. सीएनजी कारला धडक दिल्याने पेट घेतल्याने मागील कंटेनरही पेटला.
पुण्यातील नवले पूल परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. हा कंटेनर मंद उतारावरुन खाली येत होता. जवळपास २० ते २५ वाहनांना धडक देत तो पुढे गेला. त्यानंतर या कंटेनरनं एका फॅमिली कारला धडक दिली. कंटेनरची धडक बसल्यावर कार अचानक पुढे गेली. कारच्या पुढे दुसरा कंटेनर होता. दोन कंटेनरच्या मध्ये कार अडकली. कारमध्ये सीएनजीचा सिलिंडर होता. दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्यानं कारचा चेंदामेंदा झाला. सिलिंडरचा स्फोट होताच आग लागली. त्यामुळे मागील कंटेनरदेखील पेटला.
वाचवा वाचवा! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना; कार पूर्णपणे जळून खाक, आत 4-5 जण, पुण्यात भीषण अपघात
कंटेनरमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह काढण्यात यश आलं आहे. आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
डीसीपी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. कारण उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान लहान आकारचे गतीरोधक आहेत. त्यामुळे कंटेनरचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली असावी.
Pune Accident : चालत्या कंटेनरनं अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला; पुण्यात विचित्र अपघात; 5 जणांचा मृत्यू
डीसीपी संभाजी कदम यांनी सध्या तरी घातापाताची शक्यता फेटाळली आहे. ‘वाहनांमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याला सध्या प्राधान्य आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. वाहनांना लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. दोन मोठ्या वाहनांना हटवण्यासाठी क्रेन आणल्या गेल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. या अपघातामागील कारणांचा तपास नंतर केला जाईल,’ अशी माहिती डीसीपी कदम यांनी दिली.

