Jain temple controversy: अहिल्यानगरमध्ये जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी राजकीय कार्यालय उभारल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी केला आहे. याबद्दल आता ट्रस्टने समोर येत खळबळजनक खुलासा केला आहे.
जैन शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे भेट
जैन समाजाचे तसेच श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे पदाधिकारी यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा म्हणाले की, सदर भूखंडावर कोणत्याही प्रकारचे मंदिर अस्तित्वात नव्हते. राजकीय सूडभावनेतून किरण काळे यांनी ट्रस्ट आणि आमदार जगताप यांना बदनाम करण्यासाठी खोटा तक्रार अर्ज दाखल केला आहे. या खोट्या तक्रारीवरुन संबंधितांवर कारवाई व्हावी, किरण काळे यांनी खोटा अर्ज दाखल करून समाजात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रस्टची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असून, पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, जैन मंदिर ट्रस्टने अशी मागणी केली आहे.
महायुतीला धक्का! पवार काका-पुतणे एकत्र येणार; बहीण सुप्रिया सुळेंची साद, खुद्द अजित पवारांनीच…
सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खा. सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे थेट चौकशीची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की कुणाचीही जमीन हडप करून त्यावर पक्षाचं कार्यालय बांधणं अयोग्य आणि चुकीचं आहे. चांगल्या कामासाठी दिलेली जमीन जर खोट्या कागदपत्रांद्वारे वापरली जात असेल, तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ चौकशी करावी. चौकशी न होता आधीच क्लीन चीट देऊ नये, असा टोला सुळे यांनी फडणवीसांना लगावला. नगरमधील या प्रकरणावर जसं पुण्यात लक्ष घातलं तसं इथेही तातडीने लक्ष द्यावं. काही व्यक्ती जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप करत आहेत. अशा भडक भाषणांना आम्ही विरोध करू, असं म्हणत त्यांनी संग्राम जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
पूर्वीही आले होते आरोप
याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनीही जैन समाजाची जागा लाटण्याचा आरोप करत, महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेऊन संपूर्ण चौकशीची मागणी केली होती. यामुळे जैन ट्रस्ट भूखंड वाद अधिकच तीव्र झाला होता.
सध्याची परिस्थिती
एका बाजूला जैन समाजाचे ट्रस्टी पदाधिकारी आरोप फेटाळत सत्य परिस्थिती मांडत आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या मुद्द्यावर आमदार जगताप यांच्यावर आरोप करत आहेत. या वादामुळे अहिल्यानगरमध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले असून, मुख्यमंत्री फडणवीस याप्रकरणी चौकशी आदेश देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

