MNS MVA Satyacha Morcha- महाविकास आघाडी आणि मनसेच्या मतचोरीविरोधातील सत्याचा मोर्चात शरद पवारांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला. खोटपणा सिद्ध करणाऱ्याला जेल होत असून शासनाचं संरक्षण मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खोटेपणा सिद्ध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल
शरद पवार म्हणाले की, काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. काही ठिकाणी सांगण्यात आलं की इथे बनावट आधार कार्ड मिळते. सिद्ध करून द्या हे आव्हान आले. डेमो दाखवला आणि हा आरोप ज्याने केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटारडे आहेत हे सांगण्याचा, सिद्ध करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन सगळ्याला संरक्षण देते. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे, काही करा पण मतदानाची चोरी आम्ही थांबवणार. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण ऐवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये सविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचे जतन करा. त्याची आज वेळ आली आहे. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत जे प्रकार झाले. त्यामध्ये सामान्य माणसाचा संसदीय लोकशाही यावरचा विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत.
लोकशाही टिकवण्यासाठी काय पडेल ती किंमत मोजू पण…
याठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूरचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव तुमच्यासमोर सांगितला. त्यातून स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो. यांना तोंड द्यावे लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल. आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. देशाची लोकशाही टिकवायची असेल. मताचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सर्व नेते, सहकारी सगळ्यांच्या वतीने निर्णय घेतला काय पडेल ती किंमत मोजू पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ. शरद पवार भाषणाच्या सुरूवातीला म्हणाले की, आजचा हा मोर्चा मला जु्न्या गोष्टी आठवण करून देतो. महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी असे मोर्चे निघाले. काळा घोडा त्याचा परिसर तिथले मोर्चे हे एकप्रकारचा इतिहास निर्माण करणारे हे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली.

