प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं. यानंतर अजित पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी 30 जून नंतर होणार आहे. कारण यंदाच्या वर्षी सरकारवर मोठा आर्थिक भार पडलेला आहे. पण जाहीरनाम्यात शब्द दिल्याने सरकारने तो निर्णय घेतला आहे. परंतु हे सारखं सारखं होणार नाही”, असं सांगायला अजितदादा विसरले नाहीत. “वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावली पाहिजे. यात आम्हाला राजकारण करायचं नाही”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून ३० जुन रोजी कर्जमाफी होईल, असे मत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. “अतिवृष्टी, दुष्काळ पुरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतमाल व फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची मदत केली असून ती शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे”, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत, उद्याच्या मोर्चानंतर ठाकरे बंधूंची मोठी रणनीती
“कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी शासनाने चर्चा केली आहे. शासनाने कर्जमाफीसाठी कमिटी स्थापन केली असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार कर्जमाफी केली जाईल याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी आंदोलन केले असून ज्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या बाबतीत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील”, अशीदेखील प्रतिक्रिया कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

