• Sat. Jun 6th, 2026

    Jalna News: रोजगार नसल्याने ऊसतोडणीला निघाले पण काळ कोपला, सात वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने शेतमजूरावर दुःखाचा डोंगर, कालच झाला होता वाढदिवस

    Jalna News: रोजगार नसल्याने ऊसतोडणीला निघाले पण काळ कोपला, सात वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने शेतमजूरावर दुःखाचा डोंगर, कालच झाला होता वाढदिवस

    Jalna accident : अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतमजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ऊसतोडीला जात असताना एका सात वर्षीय मुलाचा भरधाव गाडीच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना , योगेश काकफळे: संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार घातला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, आणि या शेतकऱ्याच्याच भरोशावर पोट भरणारी मोल मजुरी करणारे शेतमजूर सुद्धा आता हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कित्येक कुटुंबांनी ऊसतोडीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावात काही कामधंदे नसल्यामुळे शेकडो कुटुंब हे वेगवेगळ्या कारखान्यावर ऊस तोडीचे काम करण्यासाठी रवाना झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्याभरात पाहायला मिळत आहे.

    जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील टाकळी बाजळ येथील एका कष्टकरी शेतमजुराच्या वाट्याला आज खूप मोठं दुःख आल्याची घटना घडली आहे. विलास जगताप हा शेतमजूर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह विदर्भातील मेहेकर याठिकाणच्या एका कारखान्यात कामासाठी जात होता. यावेळी त्यांच्याबरोब असलेला त्यांचा मुलगा सात वर्षीय सक्षमही सोबत होता. पण यावेळी झालेल्या अपघातात सक्षमला एका भरधाव एरटिगा गाडीने जोराची धडक दिली व त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
    Maharashtra Timesमोठी बातमी: फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, महिला आयपीएस अधिकारी करणार तपास
    ही धडक एवढी खतरनाक होती की रस्त्यावर 25 ते 30 फूट सक्षम जगताप फरफटत गेला आणि यात गंभीर जखमी होऊन सक्षमने या जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे सक्षम जगताप या सात वर्षीय चिमुकल्याचा कालच वाढदिवस झाला आणि आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण जालना जिल्ह्यात शोक काळा पसरली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच पँथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली व त्या परिवाराचे सांत्वन करत प्रशासनावर व कारखाना प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. हा बळी कारखान्याने व त्या ठिकाणी असलेल्या संबंधित ठेकेदारांनी घेतल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.

    तर याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या डोळ्यात अश्रू आले व त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे, की नको ती घटना झाली आहे, कारण कालच या चिमुकल्याचा वाढदिवस झाला आणि आज त्याने या जगाचा निरोप घेतला अशी घटना व्हायला नको पाहिजे होती, असे म्हणत त्यांनी सदर घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध केला आहे. तर पॅंथर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष संदीप खरात यांनी सुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी पोलीस प्रशासनाने करावी व संबंधित कारचालकावर योग्य ती कारवाई करून या परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा