अमरावती, दि. ३०: ज्या ठिकाणी चांगल्या बँका निर्माण होतात, त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात. सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी ‘अभिनंदन हाईट्स’ या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.
सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर, प्रवीण पोटे-पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था, बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा, अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसाय, उद्योग स्थापन करावयाचा आहे, त्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्व जाणून ‘सहकारिता मंत्रालय ‘ स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून ‘सहकारातून समृद्धीकडे’ हा मार्ग आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून ‘अभिनंदन सहकारी बँक’ सहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.
00000
00000
